भारतीय संघाने अहमदाबाद येथे झालेल्या चौथ्या कसोटीत इंग्लंडला एक डाव आणि २५ धावांनी पराभूत केले. या सामन्याच्या पहिल्या डावात भारताने १६० धावांची आघाडी मिळवली होती. याचे उत्तर देताना इंग्लंडचा दुसरा केवळ १३५ धावांत आटोपला. त्यामुळे भारताने हा सामना डावाने जिंकत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (जागतिक कसोटी अजिंक्यपद) स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामना १८ जूनपासून क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जाणार असून भारतासमोर न्यूझीलंडचे आव्हान असेल. अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी भारताला इंग्लंडविरुद्धची मालिका किमान २-१ असे जिंकणे गरजेचे होते. भारताने ही मालिका ३-१ अशी जिंकत सहजपणे अंतिम फेरी गाठली.
India 🤜🤛 New Zealand
The inaugural ICC World Test Championship finalists!
The wait will be unbearable. #WTC21 | #INDvENG pic.twitter.com/X3KcNrUTJ1
— ICC (@ICC) March 6, 2021
१७ पैकी १२ कसोटी सामने जिंकले
चौथ्या कसोटीत इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना २०५ धावा केल्या. याचे उत्तर देताना भारताने ३६५ धावा करत पहिल्या डावात १६० धावांची आघाडी मिळवली. भारताकडून रिषभ पंत (१०१) आणि वॉशिंग्टन सुंदर (नाबाद ९६) यांनी अप्रतिम फलंदाजी केली. इंग्लंडचा दुसरा डाव १३५ धावांत आटोपल्याने भारताने हा सामना एक डाव आणि २५ धावांनी जिंकला. या विजयासह भारताने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतक्त्यात अव्वल स्थान पटकावत अंतिम फेरी गाठली. भारताने १७ पैकी १२ कसोटी सामने जिंकले, तर केवळ चार सामने गमावले. त्यामुळे भारताचे सर्वाधिक ५२० गुण होते.