बर्मिंगहॅम : भारताने राष्ट्रकुल स्पर्धेच्या शेवटच्या दिवशीदेखील सुवर्णपदकांचा पाऊस पाडला. बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धा २०२२मध्ये भारताने एकूण ६१ पदकांची कमाई केली आहे. भारताने एकूण २२ सुवर्ण, १६ रौप्य, तर २३ कांस्यपदके पटकावली. त्यानुसार पदक तालिकेत भारत चौथ्या स्थानावर राहिला, तर ऑस्ट्रेलिया १७८ पदकांसह पहिल्या आणि इंग्लंड १७५ पदकांसह दुसर्या स्थानावर राहिला.
गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल (२०१८) स्पर्धेतदेखील भारत ६६ पदकांसह तिसर्या स्थानावर होता. या स्पर्धेत भारताने २६ सुवर्ण, २० रौप्य आणि २० कांस्य अशा एकूण ६६ पदकांची कमाई केली होती. राष्ट्रकुल स्पर्धेचा शेवटचा ११वा दिवस सुरू होण्याआधी भारताच्या खात्यात एकूण ५५ पदके होती. त्यामध्ये १८ सुवर्ण, १५ रौप्य आणि २२ कांस्यपदकांचा समावेश होता. शेवटच्या दिवशी कॅनडाची मिशेल ली आणि भारताची पी. व्ही. सिंधू यांच्यादरम्यान महिला एकेरीचा अंतिम सामना रंगला होता.
या सामन्यात सिंधूने मिशेल लीचा २१-१५, २१-१३ अशा फरकाने पराभव करीत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक मिळवले. पाठोपाठ लक्ष्य सेन आणि सात्विक-चिराग शेट्टीच्या जोडीने बॅडमिंटनमध्ये, तर शरत कमलने टेबल टेनिसमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. हॉकी टीमला अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून ७-० अशा पराभवाला सामोरे जावे लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. शेवटच्या दिवशी भारताने एकूण ४ सुवर्ण, १ रौप्य आणि १ कांस्यपदक कमावले.