भारतीय संघ यावर्षाअखेरीस ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार असून तीन टी-२०, तीन एकदिवसीय आणि चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या तिन्ही मालिकांसाठी सोमवारी भारताचा संघ जाहीर झाला. एकदिवसीय आणि टी-२० संघाचा उपकर्णधार रोहित शर्माचा तिन्ही संघात समावेश नव्हता. रोहितला दुखापत झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची शक्यता आहे. परंतु, रोहितला संघात का स्थान मिळाले नाही? हे बीसीसीआयने स्पष्ट करणे गरजेचे आहे, असे मत भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले.
नेट्समध्ये सराव करतोय
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला अजून दीड महिना शिल्लक आहे. मग असे असतानाही रोहितला भारतीय संघात का स्थान मिळाले नाही? तो आयपीएलमध्ये मागील दोन सामने खेळला नाही. मात्र, आपण त्याला मुंबई इंडियन्सच्या नेट्समध्ये सराव करताना पाहत आहोत. त्यामुळे त्याला काय दुखापत झाली आहे? त्याची दुखापत किती गंभीर आहे? हे कळणे थोडे अवघड असल्याचे गावस्कर म्हणाले.
भारतीय चाहत्यांना कळलेच पाहिजे
रोहितला नक्की काय झाले आहे? त्याला काय दुखापत झाली आहे? याबाबत अधिक स्पष्टता असणे गरजेचे आहे. त्याला नक्की काय दुखापत झाली आहे हे स्पष्ट झाल्यास सर्वांचाच फायदा होईल. खासकरून भारतीय क्रिकेट चाहत्यांना प्रश्न पडणार नाहीत. आयपीएल फ्रेंचायझीस खेळाडूंच्या दुखापतीबाबतची माहिती देत नाहीत, हे मी समजू शकतो. मात्र, इथे आपण भारतीय संघाबाबत बोलत आहोत. आपल्यासमोर मयांक अगरवालचेही उदाहरण आहे. रोहित आणि मयांक या दोन प्रमुख खेळाडूंना काय दुखापत झाली आहे? हे भारतीय क्रिकेट चाहत्यांना कळलेच पाहिजे असे मला वाटते, असेही गावस्कर यांनी सांगितले.