भारताची ऑफस्पिनर स्नेह राणाने पदार्पणात केलेल्या भेदक माऱ्यामुळे एकमेव महिला कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर इंग्लंडची ६ बाद २६९ अशी धावसंख्या होती. भारतीय महिला संघाचा हा सात वर्षांतील पहिला कसोटी सामना आहे. त्यामुळे या सामन्याच्या सुरुवातीला भारताच्या गोलंदाज चांगली कामगिरी करू शकल्या नाहीत. याचा फायदा इंग्लंडने घेतला. परंतु, त्यानंतर भारताच्या ऑफस्पिनर्स स्नेह राणा आणि दीप्ती शर्माने अप्रतिम गोलंदाजी करत इंग्लंडला अडचणीत टाकले. त्यामुळे इंग्लंडची २ बाद २३० वरून ६ बाद २५१ अशी अवस्था झाली होती. परंतु, सोफी डंकली (नाबाद १२) आणि कॅथरीन ब्रंट (नाबाद ७) अखेरची काही षटके खेळून काढली. भारताच्या स्नेह राणाने ७७ धावांत ३ विकेट, तर दीप्ती शर्माने ५० धावांत २ विकेट घेतल्या.
विनफिल्ड-हिल, ब्यूमॉन्टची ६९ धावांची सलामी
त्याआधी या सामन्यात इंग्लंडची कर्णधार हेथर नाईटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. इंग्लंडच्या सलामीवीर लॉरेन विनफिल्ड-हिल आणि टॅमी ब्यूमॉन्ट यांनी डावाची उत्तम सुरुवात केली. या दोघींनी ६९ धावांची सलामी दिल्यावर भारताची मध्यम गती गोलंदाज पूजा वस्त्राकरने विनफिल्ड-हिलला (३५) बाद करत इंग्लंडला पहिला झटका दिला. यानंतर मात्र ब्यूमॉन्ट (नाबाद ६६) आणि नाईट (९५) यांनी अप्रतिम फलंदाजी केली. ब्यूमॉन्टला स्नेह राणाने बाद करत ही जोडी फोडली.
दीप्ती, स्नेहने घेतल्या झटपट विकेट
कर्णधार नाईटचे शतक अवघ्या पाच धावांनी हुकले. १७५ चेंडूत ९५ धावा केल्यावर तिला दीप्ती शर्माने बाद केले. नॅटली स्किवरने ४२ धावा केल्यावर तिलाही दीप्तीने पायचीत पकडले. तर स्नेह राणाने एमी जोन्स (१) आणि जॉर्जिया एल्विस (५) यांना झटपट माघारी पाठवल्याने इंग्लंडची पहिल्या दिवसअखेर ६ बाद २६९ अशी धावसंख्या होती.