WTC फायनलसाठी भारतीय संघाने मोठी घोषणा केली आहे. आयपीएल २०२३ मध्ये चांगली कामगिरी करणारा खेळाडू अजिंक्य रहाणेला संघात स्थान मिळालं असून सूर्यकुमार यादवला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. भारत आणि
ऑस्ट्रेलिया यांच्यात येत्या ७ जूनपासून अंतिम सामना खेळवला जाणार आहे. या संघात केएस भरतला यष्टिरक्षक म्हणून संघात स्थान मिळालं आहे. तर शार्दुल ठाकूरची वेगवान गोलंदाज अष्टपैलू म्हणून निवड झाली आहे.
भारताच्या १५ सदस्यीय संघातील सर्वात मोठं नाव अजिंक्य रहाणेचं आहे. त्याच्या खराब फॉर्ममुळे त्याला संघातील स्थान गमवावे लागले होते. मात्र, आता १५हून अधिक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर रहाणेने संघात पुनरागमन केले आहे. बीसीसीआयने निवडलेल्या संघातून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहही संघातून बाहेर पडला आहे. त्याचं कारण म्हणजे नुकतीच त्याच्या पाठीची सर्जरी झाली आहे. त्यामुळे त्याला बरे होण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
अंतिम फेरीसाठी निवडलेल्या संघात शार्दुल ठाकूर व्यतिरिक्त वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट यांना संघात स्थान मिळाले आहे. तसेच अष्टपैलू म्हणून अक्षर पटेल, रवींद्र जडेजा आणि अश्विन यांनी संघात स्थान मिळवले आहे. गेल्या मालिकेत इशान किशनही यष्टिरक्षक म्हणून संघात होता. मात्र यावेळी केएस भरतचा समावेश करण्यात आला आहे.
अंतिम फेरीसाठी संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.
🚨 NEWS 🚨#TeamIndia squad for ICC World Test Championship 2023 Final announced.
Details 🔽 #WTC23 https://t.co/sz7F5ByfiU pic.twitter.com/KIcH530rOL
— BCCI (@BCCI) April 25, 2023