भारतीय संघाचे गोलंदाजीचे प्रशिक्षक (coach) पारस म्हाम्ब्रे यांनी बुधवारी गोलंदाज इशांत शर्माबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी इशांत पुन्हा संघात सक्रिय होण्याबाबत संकेत दिले आहे. इशांत शर्मा जास्त क्रिकेट खेळत नाही त्यामुळे त्याच्या खेळीवर परिणाम झाला आहे आणि काही कसोटी सामने खेळून तो पुन्हा कसोटी क्रिकेटमध्ये सक्रिय होईल असे प्रशिक्षक म्हाम्ब्रे यांनी सांगितले. सध्याच्या भारतीय संघात १०० कसोटी सामने खेळलेला इशांत हा एकमेव खेळाडू आहे आणि तो इंग्लंड दौऱ्यावर अपयशी ठरला होता. दरम्यान कानपूर येथे झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्याला एकही बळी घेता आला नव्हता.
पारस म्हाम्ब्रे यांनी म्हंटले की, “इशांत शर्मा मोठ्या कालावधीपासून जास्त कसोटी क्रिकेट खेळला नाही. तो आयपीएलमध्ये देखील खेळत नाही आणि टी-२० विश्वचषकातही खेळला नाही. त्यामुळे एवढ्या मोठ्या कालावधीचा परिणाम जाणवत आहे”. लक्षणीय बाब म्हणजे इशांत शर्माने मागील ४ कसोटी सामन्यांत १०९.२ षटकात फक्त ८ बळी घेतले आहेत.
दरम्यान, आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या सत्रात इशांत शर्माला दिल्ली कॅपिटल्सकडून खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्याला टी-२० विश्वचषकासाठी देखील वगळण्यात आले होते. म्हाब्रे यांनी सांगितले की,” आम्ही त्याच्या खेळीवर काम करत आहोत आणि आम्हाला याची माहिती आहे. मला विश्वास आहे की काही सामन्यांनंतर तो त्याच्या जुन्या लयनुसार खेळेल”.
इशांतचे काम युवा गोलंदाजांना मार्गदर्शन करणे- म्हाब्रे
३०० हून अधिक कसोटीमध्ये बळी घेणाऱ्या इशांतचे काम केवळ विरोधी संघाचे बळी घेणेच नाही तर मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णासारख्या युवा वेगवान गोलंदाजांना मार्गदर्शन करणे हे देखील आहे. म्हाब्रे यांनी म्हंटले, ” त्याच्याकडे खूप अनुभव आहे आणि त्याला ड्रेसिंग रूममध्ये ठेवल्याने खूप फरक पडतो. युवा वेगवान गोलंदाज त्याच्याकडून वेगवान गोलंदाजीचे डाव शिकू शकतात. यापासून खूप मदत मिळू शकेल.