विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने मागील काही वर्षांत कसोटी क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. भारताने ऑस्ट्रेलियामध्ये सलग दोन वेळा कसोटी मालिका जिंकण्याची किमया साधली. तसेच त्यांना इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज येथे कसोटी सामने जिंकण्यात यश आले आहे. परदेशातील या यशामुळे कोहलीच्या भारतीय संघाची ८० च्या दशकातील वेस्ट इंडिज संघाशी, तसेच ९० आणि २००० च्या दशकातील ऑस्ट्रेलियन संघाशी तुलना केली जात आहे. परंतु, भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांना ही गोष्ट फारशी आवडलेली नाही. सध्याच्या भारतीय संघाने मागील काही काळात केलेली कामगिरी कौतुकास्पद असली, तरी हा संघ ८० च्या विंडीज संघाप्रमाणे जागतिक क्रिकेटवर वर्चस्व गाजवू शकत नाही, असे गावस्कर यांना वाटते.
वर्चस्व गाजवू शकणार नाही
भारतीय संघ विंडीजप्रमाणे जागतिक क्रिकेटवर वर्चस्व गाजवेल असे मला वाटत नाही. विंडीजचा संघ प्रत्येक कसोटी मालिकेत पाच पैकी पाच सामने जिंकत होता. ९० आणि २००० च्या दशकातील ऑस्ट्रेलियन संघाला प्रत्येक कसोटी मालिकेतील पाच पैकी चार सामने जिंकण्यात यश मिळायचे. परंतु, सध्याचा भारतीय संघ अशाप्रकारे वर्चस्व गाजवू शकणार नाही. या संघामध्ये प्रतिभावान खेळाडूंची भरणा आहे, पण काही वेळा त्यांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव दिसतो, असे गावस्कर म्हणाले.
कामगिरीत सातत्य राखले पाहिजे
विंडीजचा संघ १९८० ते १९८५ या कालावधीत कसोटी क्रिकेटमध्ये अपराजित होता. या काळात त्यांना ११ पैकी १० कसोटी मालिका जिंकण्यात यश आले होते. भारतीय संघही अपराजित राहू शकेल, पण त्यांना विंडीजप्रमाणे मालिका मोठ्या फरकाने जिंकता येतील, असा गावस्करांना विश्वास वाटत नाही. या संघामध्ये प्रतिभेची कमी नाही. ते खूप यशस्वी ठरू शकतील. परंतु, परदेशात खेळताना त्यांनी कामगिरीत सातत्य राखले पाहिजे, असे गावस्कर यांनी नमूद केले.