युएईमध्ये होणारी यंदाची आयपीएल स्पर्धा आता अखेरच्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचली आहे. गुरुवारपासून (आज) प्ले-ऑफला प्रारंभ होणार असून क्वालिफायर-१ च्या लढतीत मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ आमनेसामने येणार आहेत. गतविजेत्या आणि विक्रमी चार वेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सला यंदाही जेतेपदासाठी प्रमुख दावेदार मानले जात आहे. दुसरीकडे श्रेयस अय्यरचा दिल्ली कॅपिटल्स संघ आणि विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ पहिल्यांदा आयपीएल स्पर्धा जिंकण्यास उत्सुक आहे.
A look at the Road To The Final for #Dream11IPL 2020 pic.twitter.com/Zrz7Su7qa4
— IndianPremierLeague (@IPL) November 3, 2020
मुंबई आणि दिल्ली यांच्यातील गुरुवारी होणारा क्वालिफायर-१ चा सामना जिंकणारा संघ थेट अंतिम सामन्यात प्रवेश करेल. पराभूत होणाऱ्या संघालाही अंतिम फेरी गाठण्याची आणखी एक संधी मिळेल. शुक्रवारी बंगळुरू आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात इलिमिनेटरचा सामना होणार असून या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाद होईल. तर विजेता संघक्वालिफायर-१ मध्ये पराभूत झालेल्या संघाविरुद्ध सामना खेळेल. हा क्वालिफायर-२ चा सामना जिंकणारा संघ १० नोव्हेंबरला होणाऱ्या अंतिम सामन्यात प्रवेश करेल.