लेगस्पिनर अमित मिश्रासह सर्वच गोलंदाजांच्या चांगल्या कामगिरीमुळे आम्हाला मुंबई इंडियन्सविरुद्ध विजय मिळवणे शक्य झाले, असे दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत मुंबईवरील विजयानंतर म्हणाला. मंगळवारी चेन्नईत झालेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) सामन्यात दिल्लीने मुंबईला ६ विकेट राखून पराभूत केले. या सामन्यात मुंबईने चांगली सुरुवात केली होती, पण दिल्लीने त्यांना केवळ ९ बाद १३७ धावांवर रोखले. मिश्राने चार विकेट घेत मुंबईच्या डावाला खिंडार पाडले. त्याला इतरांचीही उत्तम साथ लाभली. त्यामुळे कर्णधार पंतने या विजयाचे श्रेय गोलंदाजांना दिले.
Cometh the hour, Amit the Legend 💙
Rate Mishi bhai’s legendary spell on a scale of 1⃣ to 🔥#YehHaiNayiDilli #DCvMI #IPL2021 @MishiAmit pic.twitter.com/9mn98JHAf2
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 21, 2021
केवळ १३७ धावांवर रोखणे कौतुकास्पद
मुंबईच्या डावाची चांगली सुरुवात झाली होती. त्यामुळे आमच्यावर थोडे दडपण होते. मात्र, मिश्राच्या भेदक माऱ्यामुळे आम्ही सामन्यात पुनरागमन करू शकलो. मुंबईने ज्याप्रकारे सुरुवात केली होती ते पाहता, त्यांना केवळ १३७ धावांवर रोखणे कौतुकास्पद होते. आमच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळेच आम्ही विजय मिळवू शकलो, असे पंत म्हणाला. मिश्राने चार षटकांत २४ धावांत ४ विकेट घेतल्या. मुंबईविरुद्ध दिल्लीच्या गोलंदाजाची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. त्याने रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, किरॉन पोलार्ड आणि ईशान किशन या मुंबईच्या प्रमुख फलंदाजांना माघारी पाठवले.