भारतामध्ये कोरोनाचा धोका वाढत असल्याने ऑस्ट्रेलियाने १५ मेपर्यंत आपली हवाई वाहतूक स्थगित केली आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये खेळणारे ऑस्ट्रेलियन खेळाडू मायदेशी कसे परतणार? असा प्रश्न उपस्थित झाला होता. भारतामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यातच कोरोनाने बायो-बबलमध्ये शिरकाव केल्याने आयपीएलचा यंदाचा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडू आपल्या मायदेशी परतण्यास उत्सुक आहेत. मात्र, ऑस्ट्रेलियाने भारतातून येणाऱ्या विमानांवर १५ मेपर्यंत बंदी घातल्याने हे खेळाडू अडचणीत सापडले होते. बीसीसीआयने यावर तोडगा काढला असून ते ऑस्ट्रेलियन खेळाडूंसाठी चार्टर्ड विमानाची व्यवस्था करणार असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निक हॉकली यांनी सांगितले.
श्रीलंका किंवा मालदीव येथे नेण्यात येणार
खेळाडू, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ, पंच आणि समालोचक असे एकूण ४० ऑस्ट्रेलियन यंदा आयपीएलमध्ये सहभागी होते. त्यांना आधी भारतातून श्रीलंका किंवा मालदीव येथे नेण्यात येणार आहे. तेथून ते दुसऱ्या चार्टर्ड विमानाने ऑस्ट्रेलियात दाखल होतील. बीसीसीआय संपूर्ण ऑस्ट्रेलियन पथकाला एका जागी नेण्याची व्यवस्था करणार आहे. त्यानंतर त्यांना ऑस्ट्रेलियात येण्याची परवानगी मिळेपर्यंत ते तिथेच थांबतील, असे हॉकली म्हणाले.
बीसीसीआय करणार सर्व व्यवस्था
बीसीसीआय विविध पर्यायांचा विचार करत होते. मात्र, आता त्यांनी श्रीलंका आणि मालदीव ही दोन ठिकाणे निश्चित केली आहेत. यापैकी एका ठिकाणी ऑस्ट्रेलियन पथकाला नेण्यात येईल. बीसीसीआय त्यांना केवळ श्रीलंका किंवा मालदीवलाच नेण्याची नाही, तर त्यांना तेथून चार्टर्ड विमानाने ऑस्ट्रेलियाला आणण्याचीही व्यवस्था करणार आहे, असेही हॉकली यांनी सांगितले.