इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या यंदाच्या मोसमाबाबत सध्या बरीच चर्चा होत आहे. भारतामध्ये कोरोनाची गंभीर परिस्थिती आहे. आरोग्य व्यवस्थेवर खूप ताण आला आहे. कोरोनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. मात्र, असे असतानाही भारतातच आयपीएल स्पर्धा खेळवली जात आहे. त्यामुळे या स्पर्धेवर अनेकांनी टीका केली आहे. परंतु, यंदा आयपीएल खूप गरजेचे असल्याचे मत दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगने व्यक्त केले. कोरोनामुळे निर्माण झालेल्या सध्याच्या निराशाजनक परिस्थितीत आयपीएल स्पर्धेचे महत्व अधिक वाढले आहे, असे रिकी पॉन्टिंगला वाटते.
क्रिकेटमध्ये निराशा दूर करण्याची ताकद
भारतातील परिस्थिती गंभीर आहे. देशात कोरोनाचे संकट आहे. या संकटामुळे निराशाजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. ही निराशा दूर करून लोकांच्या आयुष्यात आनंद आणण्यासाठी क्रिकेट हे महत्वाचे माध्यम ठरू शकते. त्यामुळे यंदा आयपीएलचे महत्व अधिकच वाढले आहे, असे पॉन्टिंग म्हणाला. कोरोना काळात होत असलेल्या आयपीएलमध्ये खेळाडूंना बायो-बबलमध्ये राहावे लागत आहे. मात्र, बाहेरील परिस्थितीची आम्हाला सतत चिंता असते, असे पॉन्टिंगने नमूद केले.
आम्ही देशात सर्वात सुरक्षित
या आयपीएलमध्ये आमचे मैदानाच्या बाहेर काय सुरु आहे, याकडे सतत लक्ष असते. बायो-बबलमध्ये असल्याने आम्ही देशातील बहुधा सर्वात सुरक्षित लोक आहोत. परंतु, मी आमच्या खेळाडूंची सतत चौकशी करत असतो. बाहेरील परिस्थिती कशी आहे आणि खेळाडूंच्या कुटुंबियांबद्दल जाणून घेण्याचा मी प्रयत्न करत असतो, असेही पॉन्टिंग म्हणाला.