भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आरोग्य व्यवस्थेवर खूप ताण आला आहे. ऑक्सिजन आणि लसींचा तुटवडा जाणवत असून कोरोनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहेत. एकीकडे देशात अशी परिस्थिती दुसरीकडे इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धा खेळवली जात आहे. त्यामुळे या स्पर्धेवर अनेकांनी टीका केली आहे. भारतात आयपीएल खेळवण्याची ही वेळ नव्हे, असे अनेकांना वाटते. क्रिकेटपटूंना सध्याच्या परिस्थितीतही आयपीएल खेळायला मिळणे हे त्यांचे भाग्य असल्याचे मत भारताचा माजी नेमबाज अभिनव बिंद्राने व्यक्त केले. तसेच क्रिकेटपटूंनी केवळ स्वतःमध्ये व्यस्त राहून देशातील परिस्थितीकडे कानाडोळा करू नये, असेही बिंद्राने स्पष्ट केले.
योग्य संदेश दिला पाहिजे
क्रिकेटपटू आणि अधिकारी बायो-बबलमध्ये राहत आहेत. मात्र, याचा अर्थ त्यांना बाहेर काय सुरु आहे हे दिसत नाही किंवा ऐकू येत नाही, असा होत नाही. स्टेडियममध्ये आयपीएलचे सामने सुरु असताना स्टेडियमच्या बाहेर अॅम्ब्युलन्स रुग्णांना घेऊन रुग्णालयात जात आहेत. त्यामुळे खेळाडूंनी परिस्थितीचे भान ठेवून समाजाप्रती आदर दाखवला पाहिजे. त्यांनी या स्पर्धेतून योग्य संदेश दिला पाहिजे. मास्क लावणे कसे महत्वाचे आहे, सोशल डिस्टंसिंगचे पालन का केले पाहिजे हे खेळाडूंनी लोकांना सांगितले पाहिजे, असे बिंद्रा म्हणाला.
प्रत्येकाने जबाबदारीने वागणे गरजेचे
तसेच आयपीएलमधून मिळणारा बराचसा पैसा बीसीसीआयने लसीकरणासाठी वापरावा असे आवाहनही बिंद्राने केले आहे. आयपीएल स्पर्धा म्हणजे चॅरिटी नाही हे मला ठाऊक आहे. मात्र, मी जर बीसीसीआयच्या जागी असतो, तर आयपीएलमधून मिळालेला बराचसा पैसा लसीकरण किंवा इतर मदत कार्यांसाठी दिला असता. सध्याच्या परिस्थितीत प्रत्येकाने जबाबदारीने वागणे गरजेचे असल्याचे बिंद्रा म्हणाला.