कोरोनाचा बायो-बबलमध्ये शिरकाव झाल्याने इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेचा यंदाचा मोसम मागील महिन्यात अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला होता. परंतु, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आयपीएलचा उर्वरित मोसम युएईमध्ये घेण्याचे ठरवले आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी याबाबतची अधिकृत घोषणाही केली होती. उर्वरित मोसमाच्या तारखा जाहीर झाल्या नसल्या तरी ही स्पर्धा १९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत पार पडेल अशी चर्चा आहे. परंतु, अंतिम सामना १५ ऑक्टोबरला घेण्याबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा (ICC) आक्षेप असल्याची माहिती एका इंग्रजी वेबसाईटने दिली आहे.
अंतिम सामना १० ऑक्टोबर किंवा त्याआधी?
१८ ऑक्टोबरपासून टी-२० वर्ल्डकपला सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयपीएल स्पर्धेचा अंतिम सामना १० ऑक्टोबर किंवा त्याआधी खेळला गेला पाहिजे, असे आयसीसीचे मत आहे. तसेच १८ ऑक्टोबरपासून टी-२० वर्ल्डकपला सुरुवात होणार असल्यास या स्पर्धेत भाग घेणारे संघ त्यांच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळू देण्याचीही शक्यता कमी आहे. त्यामुळे बीसीसीआयला अंतिम सामना १० ऑक्टोबर किंवा त्याआधी घेणे भाग पडू शकेल.
टी-२० वर्ल्डकपला ऑक्टोबरच्या मध्यात सुरुवात
आयसीसीने अजून टी-२० वर्ल्डकपच्या तारखा जाहीर केलेल्या नाहीत. परंतु, त्यांनी मागील वर्षी २० जुलैला एक पत्रक प्रसिद्ध केले होते. त्यात भारतात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपला ऑक्टोबरच्या मध्यात सुरुवात होईल आणि अंतिम सामना १४ नोव्हेंबरला खेळला जाईल, असे म्हटले होते. त्यामुळे आता बीसीसीआयला आयपीएलच्या उर्वरित मोसमाचे वेळापत्रक निश्चित करण्याआधी बराच विचार करावा लागणार आहे.