भारतामध्ये कोरोनाची परिस्थिती चिंताजनक असल्याचे म्हणत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी ऑस्ट्रेलियामध्ये भारतातून येणाऱ्या प्रवासी विमानांना १५ मेपर्यंत प्रवेश दिला जाणार नाही, अशी घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेमुळे आयपीएल स्पर्धेत खेळणारे ऑस्ट्रेलियन खेळाडू, तसेच ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक आणि समालोचक अडचणीत सापडले आहेत. आयपीएल स्पर्धा ३० मेपर्यंत चालणार असून हवाई वाहतूक बंदी कायम राहिल्यास ऑस्ट्रेलियन खेळाडू मायदेशी कसे परतणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मायदेशी परतण्यासाठी स्वतःच सोय करावी लागणार असल्याचे पंतप्रधान मॉरिसन म्हणाले होते. मात्र, ऑस्ट्रेलियन सरकार आणि पंतप्रधानांकडून मिळत असलेली ही वागणूक ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू व समालोचक मायकल स्लेटर यांना अजिबातच आवडलेली नाही.
ऑस्ट्रेलियन सरकारचे आमच्याकडे दुर्लक्ष
ऑस्ट्रेलियन सरकारला आपल्या नागरिकांची काळजी असती, तर त्यांनी आम्हाला मायदेशी परतण्याची परवानगी दिली असती. आम्हाला काही झाले, तर आमचे रक्त पंतप्रधानांच्या हाती असेल. आम्हाला इतकी वाईट वागणूक देण्याची तुमची हिंमतच कशी होते? तुम्ही यावर तोडगा शोधून काढला पाहिजे. आमच्यासाठी क्वारंटाईनचे वेगळे नियम केले पाहिजेत. आयपीएलमध्ये समालोचक म्हणून काम करण्यासाठी मला ऑस्ट्रेलियन सरकारकडून परवानगी मिळाली होती. परंतु, आता तेच सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे, असा हल्लाबोल स्लेटर यांनी केला.
If our Government cared for the safety of Aussies they would allow us to get home. It’s a disgrace!! Blood on your hands PM. How dare you treat us like this. How about you sort out quarantine system. I had government permission to work on the IPL but I now have government neglect
— Michael Slater (@mj_slats) May 3, 2021
ऑस्ट्रेलियन नागरिकांना देशात परतण्यास बंदी
ऑस्ट्रेलियन सरकारने आपल्याच नागरिकांना भारतातून मायदेशी परतण्यास मनाई केली आहे. मागील १४ दिवसांपासून भारतात वास्तव्यास असलेल्या ऑस्ट्रेलियन नागरिकांना देशात परतण्यास बंदी घालण्यात आली आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता ऑस्ट्रेलियन सरकारने भारतात असलेल्या आपल्या नागरिकांसाठी थोडी काळजी दाखवणे गरजेचे होते, असेही स्लेटर म्हणाले.
हेही वाचा – ऑस्ट्रेलियाला त्यांचेच क्रिकेटपटू परके?