गतविजेत्या मुंबई इंडियन्सला यंदाच्या आयपीएल स्पर्धेची चांगली सुरुवात करता आली नाही. मुंबईला २०१२ पासून सलामीची लढत जिंकण्यात अपयश आले असून यंदाच्या स्पर्धेचीही मुंबईने पराभवाने सुरुवात केली. सलामीच्या लढतीत रोहित शर्माच्या मुंबईला विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पराभूत केले. त्यामुळे आता मुंबईचा संघ विजयाचे खाते उघडण्यासाठी उत्सुक असून मंगळवारी होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात त्यांच्यासमोर कोलकाता नाईट रायडर्सचे आव्हान असेल.
२७ पैकी २१ सामन्यांत मुंबई विजयी
कोलकाताने सनरायजर्स हैदराबादचा पराभव करत यंदाच्या मोसमाची विजयी सुरुवात केली. परंतु, त्यांच्याविरुद्ध मुंबईचे पारडे नेहमीच जड राहिले आहे. या दोन संघांमध्ये आतापर्यंत २७ सामने झाले असून त्यापैकी २१ सामने मुंबईने जिंकले आहेत. मुंबईविरुद्ध कोलकाता चांगली कामगिरी करत नाही याचा आम्ही फार विचार करत नसल्याचे कोलकाताचा माजी कर्णधार दिनेश कार्तिक म्हणाला होता. कार्तिकच्या नेतृत्वात कोलकाताने मुंबईला एकदा पराभूत (२०१९ मध्ये) केले होते. मात्र, त्यांना तीन वेळा मोठ्या पराभवांना सामोरे जावे लागले. त्यामुळे यंदाही आपले वर्चस्व कायम राखण्याचा मुंबईचा प्रयत्न असेल.
बुमराह, जेन्सनचा चांगला मारा
यंदा सलामीच्या लढतीत मुंबईला बंगळुरूने २ विकेट राखून पराभूत केले. या सामन्यात सलामीवीर क्रिस लिन (४९) आणि सूर्यकुमार यादव (३१) वगळता मुंबईच्या इतर फलंदाजांना सूर गवसला नाही. मुंबईसाठी दिलासादायक बाब म्हणजे गोलंदाजांनी चांगला मारा करत बंगळुरूला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, बंगळुरूने अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला. या सामन्यात जसप्रीत बुमराहने २६ धावांत २ विकेट घेतल्या. त्याला आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या मार्को जेन्सनने २८ धावांत २ विकेट घेत उत्तम साथ दिली. आता कोलकाताविरुद्ध ते चांगली कामगिरी सुरु ठेवतील अशी मुंबईला आशा असेल.