इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेचा यंदाचा मोसम या आठवड्यात अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला. काही खेळाडू, सपोर्ट स्टाफ सदस्य व ग्राऊंड स्टाफ सदस्यांना कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलला यंदाचा मोसम स्थगित करणे भाग पडले. मात्र, आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आलेली असून रद्द झालेली नाही, असे गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे उर्वरित मोसम यावर्षीच होण्याची शक्यता आहे. मात्र, भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णसंख्या वाढत आहे. त्यातच कोरोनाची तिसरी लाटही येण्याची शक्यता असल्याने भारतात आयपीएलचे उर्वरित सामने होऊ शकणार नाहीत, हे जवळपास निश्चितच आहे. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसनच्या मते, आता आयपीएलचे उर्वरित सामने इंग्लंडमध्ये झाले पाहिजेत.
भारताचे सर्वोत्तम क्रिकेटपटू इंग्लंडमध्येच
भारतात यावर्षी पुन्हा आयपीएल होता कामा नाही. भारताला पर्याय म्हणून लोक युएईचे नाव पुढे करत आहेत. मात्र, माझ्या मते, यंदा आयपीएलचे उर्वरित सामने सप्टेंबर महिन्यात इंग्लंडमध्ये झाले पाहिजे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका संपल्यावर सप्टेंबरमध्ये आयपीएलचे सामने घेण्यासाठी वेळ उपलब्ध होऊ शकेल. भारताचे सर्वोत्तम क्रिकेटपटू इंग्लंडमध्येच असणार आहेत. इंग्लंडचे खेळाडूही उपलब्ध असतील, असे पीटरसन म्हणाला.
सप्टेंबर क्रिकेटसाठी सर्वात अनुकूल
तसेच सप्टेंबरमध्ये इंग्लंडमधील वातावरण क्रिकेटसाठी सर्वात अनुकूल असते. या काळात आयपीएलचे सामने मँचेस्टर, लीड्स, बर्मिंगहॅम आणि लंडनमधील दोन मैदानांवर (लॉर्ड्स आणि ओव्हल) होऊ शकतील. तसेच इंग्लंडमध्ये आता कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात असल्याने प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळण्याचीही शक्यता आहे, असेही पीटरसनने सांगितले.