इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेचा यंदाचा मोसम मागील महिन्यात अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला होता. परंतु, काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) बैठक पार पडली. या बैठकीत आयपीएलचा उर्वरित मोसम सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये युएईत घेण्याबाबतचा निर्णय झाला होता. परंतु, परदेशी खेळाडूंची उपलब्धता, तसेच ऑक्टोबरमध्ये सुरु होणारा टी-२० वर्ल्डकप यामुळे आयपीएलच्या उर्वरित मोसमाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी उर्वरित मोसम युएईत ठरल्याप्रमाणे होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच ही स्पर्धा १९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत पार पडेल, असे ते म्हणाले.
उर्वरित ३१ सामने युएईत
कोरोनाचा बायो-बबलमध्ये शिरकाव झाल्याने आयपीएलचा मोसम ४ मे रोजी स्थगित करण्यात आला होता. त्याआधी ६० पैकी केवळ २९ सामनेच झाले होते. परंतु, ही स्पर्धा पूर्ण न झाल्यास बीसीसीआय आणि आठही फ्रेंचायझीस, तसेच प्रायोजक आणि प्रसारक यांचे मोठे आर्थिक नुकसान होईल. त्यामुळे उर्वरित ३१ सामने सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये युएईत घेण्याचे निश्चित झाले आहे.
आयपीएलनंतर तीन दिवसांत वर्ल्डकप?
आयसीसीने अजून टी-२० वर्ल्डकपसाठी तारीख जाहीर केलेली नसली, तरी या स्पर्धेला १८ ऑक्टोबरपासून सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयपीएल आणि टी-२० वर्ल्डकप यांच्यात खेळाडूंना केवळ तीन दिवसांचा वेळ मिळेल. भारतात कोरोनाचा धोका टळलेला नसल्याने टी-२० वर्ल्डकप यंदा युएई आणि ओमानमध्ये होऊ शकेल. परंतु, या स्पर्धेच्या आयोजनाचे हक्क बीसीसीआयकडेच राहतील.