मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाचा धोका वाढताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शनिवार आणि रविवारी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून इतर दिवशी नाईट कर्फ्यू असणार आहे. मात्र, असे असले तरी इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेचे मुंबईतील सामने ठरल्याप्रमाणेच होणार असल्याचे मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (BCCI) सांगण्यात आले होते. यंदाच्या आयपीएल स्पर्धेला ९ एप्रिलपासून सुरुवात होणार असून मुंबईत आयपीएलचे दहा सामने रंगणार आहेत. मात्र, आता मुंबईत आयपीएल सामन्यांचे आयोजन करण्यासाठी वानखेडे स्टेडियमच्या जवळ राहणाऱ्या नागरिकांनी विरोध दर्शवला आहे. त्यांनी याबाबतचे पत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.
चाहत्यांची गर्दी होण्याची भीती
नरिमन पॉईंट येथील स्टार हॉटेलमध्ये संघ राहत आहेत. त्यामुळे क्रिकेटपटूंना घेऊन जाणारी बस जेव्हा या हॉटेलजवळ येते, तेव्हा चाहते आपल्या आवडत्या क्रिकेटपटूंना पाहण्यासाठी गर्दी करतात. आयपीएल सामन्यांत प्रेक्षकांना परवानगी नसली, तरी अशीच गर्दी सामन्यांच्या वेळी वानखेडे स्टेडियमच्या जवळ होऊ शकेल अशी तेथील रहिवाशांना भीती आहे. या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण असल्याने बऱ्याच इमारती सील करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत वानखेडेवर सामने घेणे धोक्याचे ठरू शकेल असे वाटत असल्याने या रहिवाशांनी उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहीत हे सामने इतरत्र हलवण्याची विनंती केली आहे.
बीसीसीआयची चिंता वाढली
यंदा आयपीएलचे दहा सामने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहेत. मात्र, मंगळवारी या स्टेडियमच्या ग्राऊंड स्टाफपैकी आणखी दोघांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तसेच या स्टेडियममध्ये प्लम्बिंगचे काम करणाऱ्या एका व्यक्तीलाही कोरोनाची बाधा झाली आहे. मागील शनिवारी याच स्टेडियमवरील ग्राऊंड स्टाफपैकी १० जणांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे एमसीए आणि बीसीसीआयची चिंता आता वाढली आहे.