इंडियन प्रीमियर लीग (IPL) या जगातील सर्वात लोकप्रिय टी-२० स्पर्धेच्या १४ व्या मोसमाला शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. मागील मोसमानंतर जेमतेम पाच महिन्यांतच यंदाच्या मोसमाला सुरुवात होणार असल्याने चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता आहे. कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर, मागील वर्षी आयपीएल स्पर्धा युएईमध्ये घेणे भाग पडले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कायम असला तरी यंदाची स्पर्धा भारतातच आयोजित करण्याचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) निर्णय घेतला. परंतु, प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाणार नाही. तसेच कोणत्याही संघाचे सामने त्यांच्या घरच्या मैदानावर होणार नाहीत.
कोरोनाचे सावट, पण…
महाराष्ट्रासह देशामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. देशात दर दिवशी एक लाखाहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. आयपीएलवरही कोरोनाचे सावट आहे. काही खेळाडूंना, संघातील इतर सदस्य आणि मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरील ग्राऊंड स्टाफपैकी काहींना कोरोनाची बाधाही झाली. मात्र, या गोष्टीचा आयपीएलवर परिणाम होणार नाही, हे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. तसेच मुंबईत सामने ठरल्याप्रमाणेच होणार असल्याचे बीसीसीआयने सांगितले आहे.
यंदाच्या आयपीएलला विशेष महत्व
यंदाच्या आयपीएलला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. यावर्षी भारतामध्ये टी-२० विश्वचषक होणार आहे. त्यामुळे सर्वच खेळाडूंचे यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करत विश्वचषकासाठीच्या संघात स्थान मिळवण्याचे लक्ष्य असेल. मोसमाची सुरुवात गतविजेता संघ मुंबई इंडियन्स आणि रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्याने होणार आहे. सलामीची लढतच रोहित शर्माचा मुंबई आणि विराट कोहलीचा बंगळुरू या संघांमध्ये होणार असल्याने चाहते या सामन्याची आणि यंदाच्या मोसमाच्या आतुरतेने वाट पाहत आहे.