कोरोनाने बायो-बबलमध्ये शिरकाव केल्यामुळे इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) यंदाचा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. सोमवारी कोलकाता नाईट रायडर्सचे दोन खेळाडू, तसेच चेन्नई सुपर किंग्स संघाच्या काही सदस्यांना कोरोनाची बाधा झाली. त्यानंतर मंगळवारी आणखी दोन खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने बीसीसीआय आणि गव्हर्निंग कौन्सिलला यंदाचा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करणे भाग पडले. आमच्यासाठी खेळाडू आणि या स्पर्धेची जोडल्या गेलेल्या सर्वांची सुरक्षितता सर्वात महत्वाची आहे. आम्ही त्यांच्या जीवाशी खेळू शकत नाही, असे त्यावेळी बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले होते. मात्र, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने आयपीएल स्थगित होण्याबाबत भाष्य केले नव्हते. आता त्याने त्याची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
कोणीही नियमांचे उल्लंघन केले नाही
बायो-बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव कसा झाला हे आम्हाला ठाऊक नाही. आम्हाला मिळालेल्या रिपोर्टनुसार, बबलच्या नियमांचे कोणीही उल्लंघन केले नाही. आपल्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. इतक्या लोकांना कोरोनाचा संसर्ग कसा होत आहे, हे सांगणे जसे अवघड आहे, तसेच बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव कसा झाला हे सांगणे कठीण आहे, असे गांगुली एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.
युएईमध्ये स्पर्धा घेण्याबाबत झालेला विचार
आयपीएल स्पर्धा स्थगित झाली असून रद्द झालेली नाही, असे गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी स्पष्ट केले होते. परंतु, आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकात यंदा आयपीएल पुन्हा आयोजित करण्यासाठी वेळ मिळेल हे सांगणे अवघड असल्याचे गांगुली म्हणाला. तसेच मागील वर्षीप्रमाणेच यंदाही आयपीएलचा मोसम युएईमध्ये घेण्याबाबत बीसीसीआयने विचार केला होता. मात्र, फेब्रुवारी दरम्यान कोरोना रुग्णांची संख्या कमी असल्या कारणाने आम्ही यंदा आयपीएल भारतात घेण्याचे ठरवले होते, असे गांगुलीने सांगितले.