भारतात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. हाच धोका लक्षात घेऊन भारताचा अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन आणि ऑस्ट्रेलियाच्या काही क्रिकेटपटूंनी यंदाच्या आयपीएल स्पर्धेतून माघार घेतली. अश्विन आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करत होता. माझे कुटुंब कोरोनाला लढा देत असून त्यांना या कठीण काळात पाठिंबा देण्यासाठी मला त्यांच्यासोबत राहायचे आहे, असे म्हणत अश्विनने आयपीएल स्पर्धेतून माघार घेतली. मात्र, कोरोनाचा धोका वाढत असला आणि काही खेळाडू स्पर्धेतून माघार घेत असले तरीही आयपीएल सुरु राहणार असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.
खेळाडूंची स्थिती समजू शकतो
सध्या तरी आमचा आयपीएल स्पर्धा मध्येच थांबवण्याचा विचार नाही. ही स्पर्धा सुरू राहणार आहे. परंतु, सध्याची परिस्थिती अवघड आहे. त्यामुळे कोणत्याही खेळाडूला स्पर्धेतून माघार घ्यायची असल्यास आम्ही त्याला अडवणार नाही. आम्ही त्यांची स्थिती समजू शकतो, असे बीसीसीआयच्या सिनियर अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. भारतात मागील काही दिवसांत दररोज तीन लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन अँड्र्यू टाय, केन रिचर्डसन आणि अॅडम झॅम्पा या तीन ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी उर्वरित मोसमातून माघार घेत मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला.
केवळ ११ दिवस घरी
राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा अँड्र्यू टाय घरी परत जाण्याबाबत म्हणाला, ऑस्ट्रेलियाने भारतातून येणाऱ्यांवर बंदी घातल्यास मला घरी परत येता आले नसते. मागील वर्षीच्या ऑगस्टपासून मी घरी केवळ ११ दिवस घालवले आहेत. मी बराच काळ बायो-बबलमध्ये (जैव-सुरक्षित वातावरण) होतो. त्यामुळे मला आता घरी वेळ घालवायचा असल्याने मी आयपीएलमधून माघार घेतली.