आयपीएलच्या १४ व्या मोसमाला शुक्रवारपासून सुरुवात झाली. सलामीच्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा २ विकेट राखून पराभव केला. या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद १५९ अशी धावसंख्या उभारली आणि बंगळुरूने १६० धावांचे लक्ष्य अखेरच्या चेंडूवर गाठले. मुंबईचा संघ २०१२ पासून सलामीचा सामना जिंकू शकलेला नाही आणि यंदाच्या मोसमाचीही मुंबईने पराभवाने सुरुवात केली. मात्र, पहिला सामना जिंकण्यापेक्षा अंतिम सामना जिंकणे जास्त महत्वाचे असल्याचे विधान मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने केले.
काही चुका केल्या
माझ्या मते, पहिला सामना जिंकण्यापेक्षा ही स्पर्धा जिंकणे जास्त महत्वाचे आहे. आम्ही या सामन्यात बंगळुरूला चांगली झुंज दिली. आम्ही प्रथम फलंदाजी करताना पुरेशा धावा केल्या नाहीत. आम्ही आणखी २० धावा केल्या पाहिजे होत्या. तसेच आम्ही काही चुका केल्या. मात्र, हा पहिलाच सामना होता. त्यामुळे या चुका होऊ शकतात. आम्ही या चुकांचा फार विचार करण्याची आवश्यकता नाही, असे रोहित म्हणाला.
जेन्सनच्या कामगिरीने प्रभावित
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा युवा डावखुरा वेगवान गोलंदाज मार्को जेन्सनला पदार्पणाची संधी मिळाली. त्याने या संधीचा चांगला फायदा करताना २८ धावांत २ विकेट घेतल्या. जेन्सन हा प्रतिभावान खेळाडू असून तो कोणत्याही परिस्थितीत चांगली गोलंदाजी करू शकतो असे आम्हाला वाटले. त्याने या सामन्यात चांगली गोलंदाजी केली, असे रोहितने सांगितले.