इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धा २०२२ पासून १० संघांमध्ये खेळली जाणार आहे. याबाबतचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) गुरुवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) २०२८ ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश व्हावा यासाठी प्रयत्नशील असून आयसीसीच्या या निर्णयाला बीसीसीआयने पाठिंबा दर्शवला आहे.
आयपीएल स्पर्धेत दोन नव्या संघांच्या समावेशासाठी बीसीसीआय उत्सुक असल्याची माहिती होती. मात्र, पुढील वर्षीच्या (२०२१) आयपीएल स्पर्धेला आता साडे तीन महिन्यांहूनही कमी कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे बीसीसीआयने दोन नव्या संघांचा समावेश २०२२ पर्यंत पुढे ढकलला आहे. ‘२०२२ आयपीएलमध्ये दोन नवे संघ खेळताना दिसतील,’ असे बीसीसीआयच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
Board of Control for Cricket in India (BCCI) approves 10-team IPL from 2022, in its annual general meeting today pic.twitter.com/AGEEFvx5Ke
— ANI (@ANI) December 24, 2020
त्याचप्रमाणे २०२८ लॉस अँजेलिस ऑलिम्पिकमध्ये टी-२० क्रिकेटचा समावेश व्हावा यासाठी आयसीसी प्रयत्नशील असून त्यांच्या या प्रयत्नांना हातभार लावण्यास बीसीसीआयने तयारी दर्शवली आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून मान्यता मिळाल्यानंतरच ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट समाविष्ट होऊ शकणार आहे. तसेच कोरोनाचा स्थानिक क्रिकेटवर परिणाम झाला असून काही स्पर्धा कमी करण्यात आल्या आहेत. मात्र, असे असतानाही पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंना भरपाई दिली जाणार आहे.