कर्णधार ईशान किशनने केलेल्या फटकेबाजीमुळे झारखंडने विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेच्या सामन्यात मध्य प्रदेशचा ३२४ धावांनी धुव्वा उडवला. डावखुऱ्या किशनने या सामन्यात अवघ्या ९४ चेंडूत १९ चौकार आणि ११ षटकारांच्या मदतीने १७३ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे झारखंडने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ९ बाद ४२२ अशी धावसंख्या उभारली. भारतीय स्थानिक क्रिकेटमधील एकदिवसीय सामन्यात कोणत्याही संघाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या ठरली.
173 (94) 🤯
11 sixes and 19 fours 😯Jharkhand skipper Ishan Kishan has unleashed himself at the #VijayHazareTrophy 🙌🏻#OneFamily #MumbaiIndians @ishankishan51 pic.twitter.com/NNC4Osqxw6
— Mumbai Indians (@mipaltan) February 20, 2021
४२ चेंडूत अर्धशतक, ७४ चेंडूत शतक
या सामन्यात मध्य प्रदेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. किशनने सुरुवातीपासूनच गोलंदाजांवर हल्ला चढवला. त्याने अवघ्या ४२ चेंडूत अर्धशतक आणि ७४ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. शतकानंतर त्याने धावांची गती अधिकच वाढवली. त्याने अखेरच्या ७१ धावा केवळ २० चेंडूत केल्या. अखेर त्याला १७३ धावांवर गौरव यादवने बाद केले. तो बाद झाल्यावर विराट सिंह (४९ चेंडूत ६८) आणि अनुकूल रॉय (३९ चेंडूत ७२) यांनी आक्रमक शैलीत फलंदाजी केल्याने झारखंडने५० षटकांत ९ बाद ४२२ अशी धावसंख्या उभारली.
यष्टींमागे सात झेल
४२३ धावांचा पाठलाग करताना मध्य प्रदेशने सुरुवातीपासूनच ठराविक अंतराने विकेट गमावल्या. त्यामुळे त्यांचा डाव १८.४ षटकांत ९८ धावांत संपुष्टात आला. झारखंडकडून वेगवान गोलंदाज वरुण अॅरॉनने ६ विकेट घेतल्या, तर यष्टींमागे किशनने सात झेल पकडले.