भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार सामन्यांची कसोटी मालिका सध्या १-१ अशी बरोबरी असून या मालिकेतील तिसरा सामना बुधवारी खेळला जाईल. हा सामना अहमदाबाद येथे नव्याने बांधण्यात आलेल्या सरदार पटेल स्टेडियममध्ये होणार आहे. भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्माचा हा कसोटी कारकिर्दीतील १०० वा सामना असणार आहे. ईशांतने याच मालिकेत ३०० कसोटी विकेटचा टप्पा पार केला होता आणि आता तो १०० कसोटी सामन्यांचा टप्पा गाठणार आहे. या कसोटीत भारतीय संघाला विजय मिळवून देण्याचे ईशांतचे लक्ष्य आहे.
१०० कसोटीचा खेळल्याचा आनंद
१४ वर्षे हा मोठा काळ असतो. तुम्ही जेव्हा इतका काळ क्रिकेट खेळता, तेव्हा कारकिर्दीतील एक सर्वोत्तम क्षण सांगणे अवघड असते. प्रत्येकच खेळाडूच्या कारकिर्दीत चढ-उतार येतात. माझी कारकीर्दही इतरांपेक्षा वेगळी नाही. मी १०० कसोटी सामन्यांचा टप्पा गाठणार असल्याचा आनंद आहे. मी २००७-०८ मध्ये पहिल्यांदा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलो आणि तेव्हा मी खूप युवा होता. माझे केवळ माझ्या गोलंदाजीवर लक्ष असायचे. सामन्यागणिक मला नवे अनुभव मिळत गेले आणि मी त्यातून खूप शिकलो. मात्र, सुरुवातीपासूनच माझे संघाला सामना जिंकवून देण्याचे लक्ष्य असायचे आणि आजही यात बदल झालेला नाही, असे ईशांत म्हणाला.
‘या’ गोष्टीचा परिणाम झाला नाही
ईशांत आता कसोटी सामन्यांचे शतक पूर्ण करणार असला तरी त्याला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये फारसे सामने खेळायला मिळाले नाहीत. मात्र, या गोष्टीचा ईशांतच्या गोलंदाजीवर परिणाम झाला नाही. मला मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळायला आवडते. मी अधिक एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेट खेळलो असतो, तरीही १०० कसोटी सामन्यांचा टप्पा गाठू शकलो असतो. मात्र, कदाचित १०० कसोटी सामने पूर्ण होण्यासाठी अधिक कालावधी लागला असता. परंतु, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये फार संधी मिळाली नसली, तरी मी त्याचा परिणाम माझ्या कसोटीतील कामगिरीवर होऊ दिला नाही, असे ईशांतने सांगितले.