भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका सुरु असून भारतीय संघाने या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. भारताने या मालिकेची निराशाजनक सुरुवात केली होती. त्यांनी चेन्नई येथे झालेला पहिला कसोटी सामना गमावला होता. त्यानंतर भारताने दमदार पुनरागमन करत दुसरा आणि तिसरा सामना जिंकत मालिकेत आघाडी घेतली आहे. आता या मालिकेतील चौथा कसोटी सामना ४ मार्चपासून खेळला जाणार आहे. मात्र, हा सामना सुरु होण्याआधीच भारताला मोठा झटका बसला आहे. भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने वैयक्तिक कारणांमुळे या कसोटीतून माघार घेतली आहे. याबाबतची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ट्विटरच्या माध्यमातून दिली.
NEWS – Jasprit Bumrah released from India’s squad
Jasprit Bumrah made a request to BCCI to be released from India’s squad ahead of the fourth Test owing to personal reasons.
More details – https://t.co/w2wlfodmq8 #INDvENG pic.twitter.com/mREocEuCGa
— BCCI (@BCCI) February 27, 2021
निवडीसाठी उपलब्ध नसेल
‘जसप्रीत बुमराहने वैयक्तिक कारणांमुळे चौथ्या कसोटी सामन्यातून माघार घेण्यासाठी बीसीसीआयकडे विनंती केली होती. त्याची विनंती मान्य करण्यात आली असून तो चौथ्या कसोटीत भारतीय संघात निवडीसाठी उपलब्ध नसेल,’ असे बीसीसीआयचे सचिव जय शहा म्हणाले. बुमराहला या मालिकेतील दुसऱ्या कसोटीतही विश्रांती देण्यात आली होती.
दोन सामन्यांत चार विकेट
बुमराहला कसोटी मालिकेनंतर होणाऱ्या पाच सामन्यांची टी-२० मालिका आणि तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. बुमराहने इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेच्या दोन सामन्यांत चार विकेट घेतल्या. चेन्नई येथे झालेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याने तीन, तर दुसऱ्या डावात एक विकेट घेतली होती. तर तिसऱ्या कसोटीत त्याला एकही विकेट घेता आली नाही.