जॉस बटलरने केलेल्या झंझावाती खेळीच्या जोरावर इंग्लंडने तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतावर ८ विकेट राखून विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडने पाच सामन्यांच्या या टी-२० मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. मंगळवारी झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १५६ अशी धावसंख्या उभारली होती. इंग्लंडने १५७ धावांचे लक्ष्य १८.२ षटकांत गाठले. इंग्लंडकडून सलामीवीर जॉस बटलरने अप्रतिम फलंदाजी केली. त्याने ५२ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ८३ धावांची खेळी केली. त्याला जॉनी बेअरस्टोने २८ चेंडूत नाबाद ४० धावांची खेळी करत उत्तम साथ दिली. त्यामुळे इंग्लंडला हा सामना जिंकण्यात यश आले. भारताकडून वॉशिंग्टन सुंदर आणि युजवेंद्र चहल यांनी १-१ विकेट घेतली.
England win the third T20I by eight wickets!
Jos Buttler stars for his team with a blazing 83* 🔥#INDvENG | https://t.co/ijRJxPRtsz pic.twitter.com/SFWAYYrHus
— ICC (@ICC) March 16, 2021
कोहलीची एकाकी झुंज
त्याआधी या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या डावाची अडखळती सुरुवात झाली. लोकेश राहुल (०), रोहित शर्मा (१५) आणि ईशान किशन (४) हे फलंदाज झटपट माघारी परतले. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि रिषभ पंतने चौथ्या विकेटसाठी ४० धावांची भागीदारी रचत भारताचा डाव सावरला. पंतने २० चेंडूत २५ धावा केल्यावर त्याला बटलरने धावचीत केले. कोहलीने मात्र अप्रतिम फलंदाजी सुरु ठेवत ४६ चेंडूत ८ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ७७ धावांची खेळी केली. त्यामुळे भारताने २० षटकांत ६ बाद १५६ अशी धावसंख्या उभारली. इंग्लंडच्या मार्क वूडने ३ विकेट घेतल्या.