लोकेश राहुलने केलेल्या शतकाच्या जोरावर भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडपुढे ३३७ धावांचे आव्हान ठेवले आहे. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये होत असलेल्या या सामन्यात भारताच्या फलंदाजांनी अप्रतिम खेळ केला. राहुलला एकदिवसीय मालिकेआधी झालेल्या टी-२० मालिकेत चांगली कामगिरी करण्यात अपयश आले होते. तो टी-२० मालिकेच्या चार डावांमध्ये मिळून केवळ १५ धावा करू शकला होता. मात्र, एकदिवसीय मालिकेत त्याने दमदार खेळ केला आहे. या मालिकेच्या पहिल्या सामन्यात त्याने नाबाद ६२ धावांची खेळी केली होती. तर आज होत असलेल्या सामन्यात त्याने ११४ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १०८ धावा केल्या. त्यामुळे भारताने तीनशे धावांचा टप्पा पार केला.
KL Rahul ➞ 108
Rishabh Pant ➞ 77
Virat Kohli ➞ 66A strong batting performance has powered India to 336/6 in the second ODI 👀#INDvENG ➡️ https://t.co/t8SUo38VoP pic.twitter.com/axAGv101Lo
— ICC (@ICC) March 26, 2021
कोहली, राहुलने सावरले
या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. भारताच्या डावाची अडखळती सुरुवात झाली. सलामीवीर शिखर धवन (४) आणि रोहित शर्मा (२५) झटपट बाद झाले. मात्र, कर्णधार विराट कोहली आणि राहुल यांनी तिसऱ्या विकेटसाठी १२१ धावांची भागीदारी रचत भारताचा डाव सावरला. कोहलीने या मालिकेतील सलग दुसरे अर्धशतक झळकावले. मात्र, ६६ धावांवर त्याला आदिल रशिदने बाद करत ही जोडी फोडली.
हार्दिक, पंतची फटकेबाजी
राहुलने मात्र चांगली फलंदाजी सुरु ठेवत १०८ चेंडूत आपले एकदिवसीय क्रिकेटमधील पाचवे शतक केले. त्याला रिषभ पंतची उत्तम साथ लाभली. पंतने अवघ्या ४० चेंडूत ३ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ७७ धावांची खेळी केली. तर राहुल १०८ धावा करून बाद झाला. यानंतर अखेरच्या षटकांत हार्दिक पांड्याने (३५) केलेल्या फटकेबाजीमुळे भारताने ५० षटकांत ६ बाद ३३६ अशी मजल मारली.