मुंबई | मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचा आज ५० वा वाढदिवस आहे. सचिनच्या वाढदिवसानिमित्ताने माजी क्रिकेटर सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी खास पत्र लिहिले आहे. या पत्रातून सुनील गावसकर यांनी सचिनची जुनी आठवण सांगितली आहे. “१९८६-८७चा काळ असा होता, यात मुंबईतील कोणतेही वर्तमानपत्र उगडले की सतत सचिन तेंडुलकर-विनोद कांबळीची नावे वाचायला मिळायची. मला आठवते की, मी १९८७ मध्ये बायसेंटेनरी कसोटी सामना खेळण्यासाठी इंग्लंडला जात होतो. तेव्हा माझ्या गाडीत हेमंत वायंगणकर आणि अनिल जोशी होते.
मी सचिनबद्दल वर्तमान पत्रात वाचले होते. पण, अनिल आणि हेमंतने सचिनला खेळताना बघितले होते. हे दोघेही मला सांगत होते की, विनोद कांबळी ही उत्तम फलंदाज आहे. पण, सचिनमध्ये नक्कीच काही तरी खास आहे. ऐवढ्यात हेमंत वायंगणकर म्हणाले, सचिन थोडा नाराज आहे. कारण, सचिनला मुंबई क्रिकेट संघटनेचा त्या वर्षीचा सर्वोत्तम ज्युनियर खेळाडू म्हणून पुरस्कार मिळाला नव्हता. मला हे ऐकून हसू आले विमानतळावर आत जाण्याआधी मी माझ्या बॅगेतून माझे लेटरहेड काढले आणि कारच्या बॉनेटवर कागद ठेवून सचिनकरिता एक चिठ्ठी लिहिली.
या चिठ्ठीत मी सचिनला लिहिले होते की, तुला नाराज होण्याची गरज नाही. कारण, अजून एका खेळाडूलाही हे बक्षीस दिले गेले नाही. आणि क्रिकेटर म्हणून त्यांची कामगिरी वाईट नाही, असे मी पत्रात लिहून मी माझे एक जुने पॅडचे पेअर सचिनला भेट म्हणून हेमंत आणि अनिल जोशीच्या हस्ते पाठविले होते. मला त्या कमी वजनाच्या पॅडचा खूप उपयोग होत होता. कारण, क्रिकेटच्या धावा जमा करायचे माझे हे तंत्र एकेरी धावा पळून काढण्यावर होते. मी सचिनला म्हणालो, तू तर जोरदार चौकार मारत असतो. तुला या कमी वजनाच्या पॅडची गरज नाही.
यानंतर हेमंत आणि अनिल जोशीबरोबर आम्ही पारसी जिमखान, इस्लाम जिमखाना, पीजे हिंदू जिमखाना मैदानावरच्या सचिन-विनोदच्या मॅचेस गाडी रस्त्याच्या कडेला लावून बघत असायचो. एकदा गंमत झाली की, आम्ही माझ्या नवीन मारुती कारमध्ये बसून क्रिकेटचा सामना बघत होतो. त्यावेळी मारुती कार नुकत्याच दिसू लागल्याने लोक देखील उत्सुक होत होती. यावेळी सचिनने मारलेला सिक्सर आमच्या कारवरून गेला. मनात माझ्या चर्रर्र झाले की, नवीन कारवर चेंडू लागला असता तर आमच्या गाडीला दुखापत झाली असती.
मला गुणवत्ता या शब्दाचे तेवढे कौतुक नाही. गुणवत्ता सगळ्यांकडेच असते. कोणाकडे कमी कोणाकडे जास्त असते. पण, मुख्य मुद्दा असतो की, तुमच्या हाती असलेल्या गुणवत्तेला तुम्ही सातत्यपूर्ण मेहनतीने न्याय कसा देता. तुम्ही अडचणीतून मार्ग कसा काढता. मी खात्रीने म्हणू शकतो की, सचिनने गुणवत्तेला पूर्ण न्याय दिला. सचिनने खेळावर प्रेम केले.
सचिन नेहमी मैदानात खेळताना मोठी खेळी करायच्या ध्येयानेच यायचा. अजून एक गोष्ट माझ्या नजरेत आली ती म्हणजे गॅरी सोबर्स, गुंडुप्पा विश्वनाथ यांना खेळताना मी बघितले. जे चांगल्या चेंडूलाही चौकार मारू शकायचे, अशी फलंदाजीची नजाकत त्यांच्यात होती. तशीच क्षमता सचिनमध्ये मला नेहमी दिसायची. म्हणून मला सचिनची फलंदाजी बघताना खूप आनंद मिळायचा.
मी सचिनला ५० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ऐवढेच म्हणेन की, सचिनने सर्व क्रिकेटरांसाठी एक चांगला आदर्श ठेवला आहे. सचिनची मैदानावरची आणि मैदानाबाहेरची वागणूक ही अत्यंत सभ्य राहिलेली आहे. आपल्या क्षमतेला पूर्ण न्याय देणाऱ्या सचिनबद्दल म्हणून मला नुसते कौतुक नाही, तर प्रेम वाटते.