धाकड, निडर, बिंदास ही विशेषणे जिला तंतोतंत लागू पडतात ती म्हणजे भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राज. भारतीय महिला तिने निवडलेल्या क्षेत्रात सर्वोच्च पातळीवर जाऊ शकते, आपल्या कर्तृत्वाने जगावर ठसा उमटवू शकते याचे मिताली उत्तम उदाहरण आहे. मितालीने नुकताच एकदिवसीय क्रिकेटमध्ये ७ हजार धावांचा टप्पा पार केला आणि ही कामगिरी करणारी ती जागतिक क्रिकेटमधील पहिली महिला खेळाडू ठरली. त्याआधी काही दिवस तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण केल्या आणि इंग्लंडची माजी कर्णधार शार्लेट एडवर्ड्सनंतर हा टप्पा पार करणारी ती केवळ दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली. एडवर्ड्सच्या कामगिरीचे कौतुक आहेच, पण मुळात इंग्लंड आणि भारत या दोन देशांमधील संस्कृती, महिलांना असलेले स्वातंत्र्य यात मोठा फरक आहे. इंग्लंड हा देश ‘मॉर्डन’ मानला जातो. तिथे महिला क्रिकेटलाही पुरेशा सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. मात्र, भारताचे तसे आहे का?
भारतात महिला क्रिकेट खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आले ते २०१७ एकदिवसीय वर्ल्डकपनंतर. भारतीय संघाने या वर्ल्डकपची अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत भारताला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी भारताच्या महिलांनी दाखवलेल्या जिद्दीचे सर्वत्र कौतुक झाले. या संघाचे नेतृत्व कोणी केले? मितालीनेच! मात्र, हा वर्ल्डकप आणि मितालीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण यादरम्यान १८ वर्षे उलटून गेली. प्रकाशझोतात न राहता, आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचे कौतुक होत नसतानाही इतकी वर्षे खेळत राहणे फार अवघड आहे. मात्र, मितालीचे क्रिकेटवर असलेले प्रेम आणि तिला देशासाठी खेळत असल्याचा अभिमान यातूनच दिसून येतो.
हवाई दलाचे माजी अधिकारी असलेल्या मितालीच्या वडिलांनी अगदी लहानपणासून तिला कडक शिस्त लावली. वयाच्या आठव्या वर्षापासूनच ती मोठ्या भावासोबत क्रिकेटचे प्रशिक्षण घेऊ लागली. यातूनच मिताली खऱ्या अर्थाने घडली. तिने १९९९ मध्ये वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि आपल्या पहिल्याच एकदिवसीय सामन्यात आयर्लंडविरुद्ध नाबाद शतकी खेळी करून भारताला विजय मिळवून दिला. त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही.
२००० च्या दशकात ज्याप्रमाणे सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, अनिल कुंबळे, लक्ष्मण यांनी भारतीय पुरुष क्रिकेट संघाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले, त्याचप्रमाणे महिला क्रिकेटमध्ये मिताली, झुलन गोस्वामी या दोघींनी मिळून भारतीय संघाचा दर्जा उंचावला. हळूहळू युवा खेळाडू पुढे येत गेल्या आणि भारतीय महिला संघ इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांना झुंज देऊ लागला. या युवा खेळाडूंना लढण्याचा, जिंकण्याचा विश्वास दिला तो मिताली आणि झुलन यांनीच.
मिताली तिच्या तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी ओळखली जाते. जगात कुठेही, कोणत्याही खेळपट्टीवर धावा करण्याची तिच्यात क्षमता आहे. महिला क्रिकेटमध्ये अजूनही फारसे कसोटी सामने खेळले जात नाहीत. २१ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत मितालीला केवळ १० कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. मात्र, त्यातही तिने एक द्विशतक झळकावताना विक्रमाला गवसणी घातली होती. तिने २००२ मध्ये टॉन्टन येथे झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत २१४ धावांची खेळी केली आणि महिला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम आपल्या नावे केला होता. मात्र, त्यानंतर पाकिस्तानची खेळाडू किरण बलुचने (२४२) तो मोडला.