महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने २०११ वर्ल्डकपचे जेतेपद पटकावले होते. भारताच्या या ऐतिहासिक विश्वविजयाला शुक्रवारी १० वर्षे पूर्ण झाली. २ एप्रिल २०११ रोजी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेला ६ विकेट राखून पराभूत केले होते. या सामन्यात २७५ धावांचा पाठलाग करताना भारताची ३ बाद ११४ अशी अवस्था होती. त्यावेळी फॉर्मात असलेला युवराज सिंग मैदानात येईल अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र, युवराजच्या आधी धोनी फलंदाजीला आला आणि त्याने नाबाद ९१ धावांची अविस्मरणीय खेळी केली. धोनीने फॉर्मात असलेल्या युवराजच्या मागे ठेवत स्वतः फलंदाजीला येत धाडस दाखवले होते, असे विधान त्या भारतीय संघाचे स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग प्रशिक्षक पॅडी अपटन यांनी केले.
संघाच्या हितासाठी योग्य निर्णय
धोनी कर्णधार म्हणून खूप शांत आणि संयमी होता. वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात त्याच्यासारखा खेळाडू आमच्या संघात असल्याचा खूप फायदा झाला. युवराजने त्या वर्ल्डकपमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्याला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळणार हे जवळपास निश्चितच होते. मात्र, असे असतानाही धोनीने अंतिम सामन्यात युवराजच्या आधी फलंदाजीला येण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाबाबत खूप चर्चा होईल हे धोनीला ठाऊक होते. मात्र, त्याने धाडस दाखवत संघाच्या हितासाठी योग्य तो निर्णय घेतला, असे अपटन एका मुलाखतीत म्हणाले.
कर्णधार म्हणून पुढाकार
धोनीला वर्ल्डकपमध्ये फार धावा करता आल्या नव्हत्या. परंतु, कर्णधार म्हणून आपण कधी पुढाकार घेतला पाहिजे हे धोनीला ठाऊक होते. दबावाच्या परिस्थितीत धावा करण्याची धोनीमध्ये क्षमता होती. त्याने त्याआधी अनेकदा भारताला सामने जिंकवून दिले होते. परंतु, त्याने जो निर्णय घेतला, तो सोपा नव्हता. मात्र, त्याने धाडस दाखवत युवराजच्या आधी फलंदाजी केली आणि भारताला सामना जिंकवून दिला, असेही अपटन यांनी सांगितले.