भारतीय संघाला चेन्नई येथे झालेल्या पहिल्या कसोटीत पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडने हा सामना जिंकण्यासाठी भारतापुढे ४२० धावांचे आव्हान ठेवले होते आणि याचा पाठलाग करताना भारताला १९२ धावाच करता आल्या. या सामन्यात भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे सपशेल अपयशी ठरला. पहिल्या डावात तो केवळ १ धाव करू शकला, तर दुसऱ्या डावात जेम्स अँडरसनने त्याला खातेही उघडू दिले नाही. त्यामुळे भारताचा माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकरने रहाणेवर टीका केली. ‘रहाणेला कर्णधार बनवण्यात एक अडचण आहे आणि ती म्हणजे फलंदाज रहाणे. मेलबर्नमधील शतकानंतर त्याने नाबाद २७, २२, ४, ३७, २४, १ आणि ० अशा धावा केल्या आहेत. उत्कृष्ट खेळाडू शतकानंतर आपला फॉर्म कायम राखतात आणि फॉर्मात नसलेल्या खेळाडूंवरील दडपण कमी करतात,’ असे मांजरेकरने त्याच्या ट्विटमध्ये लिहिले.
My issue with Rahane the captain is Rahane the batsman.
After that 100 in Melbourne his scores are – 27*, 22, 4, 37, 24, 1 & 0. After a 100, class players carry their form & carry the burden of players out of form. #INDvENG— Sanjay Manjrekar (@sanjaymanjrekar) February 9, 2021
अजिंक्य प्रमुख फलंदाज
पहिला कसोटी सामना संपल्यावर भारताचा कर्णधार विराट कोहलीलाही रहाणेच्या निराशाजनक कामगिरीविषयी प्रश्न विचारला गेला. मात्र, कोहलीने रहाणेची पाठराखण केली. ‘अजिंक्यबद्दल प्रश्न विचारून तुम्हाला काहीतरी खळबळजनक उत्तर मिळेल असे तुम्हाला वाटत असल्यास तसे काहीच होणार नाही. अजिंक्य आणि पुजारा हे आमच्या कसोटी संघाचे प्रमुख फलंदाज आहेत. त्याच्या क्षमतेवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे,’ असे कोहली म्हणाला.
हेही वाचा – WTC : भारताची चौथ्या स्थानी घसरण