भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) ऐतिहासिक कामगिरी केली होती. ऑलिम्पिकच्या अॅथलेटिक्स स्पर्धांत सुवर्णपदक जिंकणारा नीरज हा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला होता. या कामगिरीनंतर देशभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसेच मंगळवारी (आज) त्याच्यासाठी पानिपत येथे विशेष स्वागत सोहळ्याचे आयोजन केले होते. त्याच्यासाठी दिल्ली ते पानिपत रॅली काढण्यात आली. जवळपास सहा तासांच्या या प्रवासात नीरजने गाडीच्या वरच्या भागातून बाहेर येत चाहत्यांचे आभार मानले. परंतु, यावेळी उष्णतेचा नीरजच्या प्रकृतीवर परिणाम झाला. त्याने काही औषधे घेतली. परंतु, त्यानंतरही ताप आल्यासारखे वाटत असल्याने त्याने स्वागत सोहळा अर्ध्यातच सोडला.
कोरोना अहवाल निगेटिव्ह आलेला
नीरजने ७ ऑगस्टला टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली होती. त्याच्या या कामगिरीचे देशभरातून कौतुक झाले. तसेच त्याचे मायदेशी जल्लोषात स्वागत करण्यात आले. काही दिवसांपूर्वी त्याची त्याची प्रकृती बिघडली होती. परंतु, त्याचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने तो स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावर झालेल्या सोहळ्यात उपस्थित राहिला. तर मंगळवारी त्याच्यासाठी दिल्ली ते पानिपत रॅली काढण्यात आली.
Golden boy #NeerajChopra going towards panipat from delhi. pic.twitter.com/igx2ojMuln
— Nikhil (@NikhilCh_) August 17, 2021
नीरजची ‘सुवर्ण’ कामगिरी
नीरजने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीच्या अंतिम फेरीत ८७.५८ मीटर अंतराची नोंद करत सुवर्णपदक पटकावले होते. ऑलिम्पिक स्पर्धांत वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा तो अभिनव बिंद्रानंतर केवळ दुसरा भारतीय खेळाडू ठरला. टोकियो ऑलिम्पिकमधील अॅथलेटिक्स स्पर्धांतील सर्वोत्तम दहा क्षणांमध्ये नीरजच्या सुवर्ण कामगिरीचा समावेश होता.
हेही वाचा – ‘दर्जा वाढलाय’! सचिनकडून रोहित शर्माचे कौतुक