चेतेश्वर पुजाराने मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात १२०० हून अधिक चेंडूत ५२१ धावा केल्या होत्या. आता त्याने अॅडलेड येथे सुरु झालेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात ४३ धावा करण्यासाठी १६० चेंडू खेळून काढले. मयांक अगरवाल आणि विराट कोहली यांनाही धावफलक हलता ठेवण्यात अपयश आले. त्यामुळे पहिल्या दोन सत्रांत भारताला ५५ षटकांत १०७ धावाच करता आल्या होत्या. पहिल्या दोन सत्रांत भारताने फारच सावधपणे फलंदाजी केल्याचे काही क्रिकेट समीक्षकांना वाटले. मात्र, सुरुवातीला सावधपणे खेळणे गरजेचेच होते, असे मत पुजाराने पहिल्या दिवसाच्या खेळानंतर व्यक्त केले.
18* runs from 100 balls 👀
Just Cheteshwar Pujara things 😃#AUSvIND | #WTC21 pic.twitter.com/p8ex2iR6qS
— ICC (@ICC) December 17, 2020
आम्ही सावधपणे फलंदाजी केल्याचे अजिबातच दुःख नाही. पहिल्या दोन सत्रांनंतर आमचा संघ सुस्थितीत होता. सुरुवातीला चेंडू स्विंग होत होता. त्यामुळे सावधपणे फलंदाजी करून विकेट न गमावण्याचा आमचा प्रयत्न होता. आम्ही फटके मारण्याच्या नादात अधिक विकेट गमावल्या असत्या आणि बहुधा आमचा डाव पहिल्या दिवशीच संपुष्टात आला असता. त्यामुळे सावधपणे फलंदाजी करण्याची आमची योजना योग्यच होती, असे पुजारा म्हणाला. कसोटी क्रिकेटमध्ये संयम खूप महत्वाचा असतो. खेळपट्टी सपाट असल्यास तुम्ही आक्रमकपणे फलंदाजी करू शकता, पण गोलंदाजांना खेळपट्टीकडून मदत मिळत असल्यास फलंदाज म्हणून तुम्हाला सावध खेळ करावा लागतो, असेही पुजाराने सांगितले.