बांगलादेशविरूद्धच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलला संघात स्थान न मिळाल्याने क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगली आहे. भारताविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात त्याने १० बळी घेऊन इतिहास रचला होता. त्यामुळे फॉर्ममध्ये असलेल्या एजाज पटेलला संघातून बाहेर ठेवल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान या निर्णयामुळे न्यूझीलंडच्या निवड समितीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशातच न्यूझीलंडच्या संघाचे प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी एजाज फिट नसल्याने त्याला बाहेर ठेवल्याचे सांगितले आहे. तर रचिंद्र रवींद्रला फिरकीपटू म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे. केन विलियमसन देखील या मालिकेसाठी न्यूझीलंडच्या संघाचा हिस्सा नसणार आहे.
एजाजला संघातून बाहेर ठेवण्याच्या निर्णयावर गॅरी स्टीडने म्हटले की, भारतात इतिहास रचणाऱ्या एजाजसाठी सर्वांना वाईट वाटते आहे. मात्र ते नेहमीच संघाच्या गरजेनुसार खेळाडूंची निवड करतात. त्यांच्या म्हणण्यानुसार ज्या खेळाडूंची बांगलादेशविरूध्दच्या मालिकेसाठी निवड झाली आहे, ते संघात फिट आहेत.
न्यूझीलंडमध्ये एजाजचे खराब प्रदर्शन
एजाजने आतापर्यंत न्यूझीलंडमध्ये तीन कसोटी सामने खेळले आहेत मात्र कोणत्याच सामन्यात त्याला बळी घेण्यात यश आले नाही. तीन सामन्यांमध्ये एजाजने ४९ षटके गोलंदाजी केली आणि १०६ धावा दिल्या आहेत. यापूर्वी एजाजने बागंलादेशविरुद्ध ४३ षटके गोलंदाजी केली आहे पण त्याला एकही बळी घेता आला नाही.
कर्णधार म्हणून लाथमची पहिलीच मालिका
न्यूझीलंडचा विकेटकिपर टॉम लाथम पहिल्यांदाच पूर्ण मालिकेसाठी कर्णधार असणाक आहे. यापूर्वी त्याने चारवेळा विलियमसनच्या गैरहजेरीत संघाची कमान सांभाळली आहे. भारताविरूद्धच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात देखील त्याने कर्णधारपद सांभाळले आहे.
हे ही वाचा: http://IND vs SA : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत रिषभ पंतला धोनीचा विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी