आशिया चषकाच्या ‘सुपर ४’ फेरीत आज पाकिस्तान आणि बांगलादेश यांचा सामना होणार आहे. हा या फेरीतील शेवटचा सामना आहे. भारताने आधीच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तर पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामना जो संघ जिंकेल तो स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश करेल. पाकिस्तान या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचण्याआधीच त्यांचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांना पाकिस्तान ही स्पर्धा जिंकेल याचा विश्वास आहे.
भारताला अंतिम सामन्यात हरवू
मिकी आर्थर बांगलादेशविरुद्धच्या सामन्याआधी म्हणाले, “पाकिस्तान ‘सुपर ४’ चा बांगलादेशविरुद्धचा सामना जिंकून अंतिम सामन्यात जाईल. अंतिम सामन्यात भारताचा पराभव करून आधीच्या दोन पराभवांचा आम्ही बदला घेऊ. कारण महत्वाच्या सामन्यांत आम्ही आमचा खेळ उंचावतो.”
भारताविरुद्ध फलंदाजांनी घात केला
भारताविरुद्धच्या दोन सामन्यांत पाकिस्तानच्या फलंदाजांना १६२ आणि २३७ धावचं करता आल्या. त्यामुळे भारताने हे दोन सामने अगदी सहज जिंकले. याबद्दल आर्थर म्हणाले, “भारताच्या गोलंदाजांवर दबाव टाकायला आमचे फलंदाज अपयशी ठरले. फलंदाजांनी चांगला खेळ केला नाही. तर गोलंदाजांना सुरुवातीला विकेट घेण्याची गरज होती. पण खराब फिल्डिंगमुले तेही झाले नाही.”