टी-२० विश्वचषकानंतर ट्रोल झालेल्या हसन अलीने चमकदार कामगिरी करत एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. बांगलादेशविरूध्द चटगावच्या जाहुर अहमद चौधरी मैदानात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात त्याने ५ बळी पटकावले आहेत. हसन अलीने २०२१ मध्ये पाच वेळा असा कारनामा केला आहे. या सोबतच त्याने पाकिस्तानचे दिग्गज खेळाडू इमरान खान, वकार युनूस,सकलेन मुश्ताक आणि यासिर शाह यांची बरोबरी साधली आहे. इमरान, सकलेन आणि यासिरने पण एका वर्षात पाच वेळा एका डावात ५ बळी घेण्याचा विक्रम केला होता. वकार युनूसने १९९० मध्ये १७.०४ च्या सरासरीने ५ वेळा पाच बळी पटकावले होते.
दरम्यान, वकार युनूसने त्याच्या या विक्रमाला १९९३ मध्ये आणखी चांगले केले होते. १९९३ मध्ये १२ महिन्यात वकार युनूसने १५.२३ च्या सरासरीने ५५ बळी घेतले होते. यामध्ये त्याने ६ डावात ५ बळी पटकावले होते.
हसन अलीने २०२१ मध्ये आतापर्यंत १५.४० च्या सरासरीने ३७ बळी घेतले आहेत. त्याच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने बांगलादेशला पहिल्या डावात ३३० धावांवर सर्वबाद केले. मुशफिकुर रहीमने (९१) आणि लिटन दासने (११४) धावांची खेळी केली. पाकिस्तानने पहिल्या डावात २८६ धावा केल्या आणि बांगलादेशला पहिल्या डावाच्या आधारावर ४४ धावांची आघाडी मिळाली.
पाकिस्तानकडून पहिल्या डावात आबिद अलीने १३३ धावा केल्या आणि अब्दुला शफीफने ५२ धावा केल्या. त्याव्यतिरिक्त फहीम अशरफने ३८ धावांची खेळी केली. तर कर्णधार बाबर आझम (१०) तर उपकर्णधार मोहम्मद रिझवान (५) धावांची निराशाजनक खेळी केली. लक्षणीय बाब म्हणजे पाकिस्तानच्या ५ फलंदाजांना दहाचा आकडा देखील पार करता आला नाही. बांगलादेशकडून तजिउल इस्लामने सर्वाधिक ७ बळी पटकावले. सोबतच बांगलादेशने ८३ धावांची आघाडी घेतली.