चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियममध्ये झालेला पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत दमदार पुनरागमन केले. चेन्नईतच झालेला दुसरा, तर अहमदाबाद येथे नव्याने बांधण्यात आलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेला तिसरा कसोटी सामना जिंकत भारताने चार सामन्यांच्या या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. मात्र, भारताच्या कामगिरीपेक्षा या सामन्यांतील खेळपट्टीबाबत अधिक चर्चा झाली. या दोन्ही कसोटीत पहिल्या चेंडूपासून फिरकीपटूंना मदत मिळाल्यानेच भारताला विजय मिळवण्यात यश आल्याचेही म्हटले गेले. आता चौथ्या कसोटीची खेळपट्टी पुन्हा फिरकीला अनुकूल असण्याची दाट शक्यता आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीला ४ मार्चपासून सुरुवात होत आहे. हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियममध्येच पार पडणार आहे.
इंग्लंडच्या अडचणी वाढू शकतील
चौथ्या कसोटी सामन्याची खेळपट्टी फिरकीला अनुकूल असण्याची शक्यता असून इंग्लंडच्या अडचणी वाढू शकतील. नुकताच झालेला तिसरा कसोटी सामना अवघ्या दोन दिवसांतच संपला. त्यामुळे या सामन्याच्या खेळपट्टीवर मायकल वॉन आणि केविन पीटरसन या इंग्लंडच्या माजी कर्णधारांसह भारताच्या काही माजी क्रिकेटपटूंनी टीका केली. मात्र, खेळपट्टीबाबत सुरु असलेली चर्चा रविचंद्रन अश्विन, रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहली यांना फारशी आवडली नाही.
उमेशला संघात स्थान?
आता चौथ्या कसोटीची खेळपट्टीही फिरकीला अनुकूल असण्याची शक्यता असून चायनामन कुलदीप यादव आणि वेगवान गोलंदाज उमेश यादव यांना संधी मिळेल अशी चर्चा आहे. भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने वैयक्तिक कारणांमुळे चौथ्या कसोटीतून माघार घेतली आहे. त्याच्या जागी संधी देण्यासाठी भारताकडे उमेश आणि मोहम्मद सिराज या दोन वेगवान गोलंदाजांचा पर्याय आहे. सिराजला दुसऱ्या कसोटीत केवळ आठ षटके टाकण्याची संधी मिळाली आणि त्याने एक विकेट घेतली. परंतु, उमेश आता पूर्णपणे फिट झाल्याने त्याची चौथ्या कसोटीसाठी संघात निवड होऊ शकेल.