भारत आणि इंग्लंड यांच्यात पुढील महिन्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ४ ऑगस्टपासून नॉटिंगहॅम येथे खेळला जाणार आहे. परंतु, त्याआधीच भारताला तीन धक्के बसले होते. युवा सलामीवीर शुभमन गिल, अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर आणि वेगवान गोलंदाज आवेश खान यांना दुखापतीमुळे या मालिकेला मुकावे लागणार आहे. आता त्यांची जागा घेण्यासाठी निवडकर्त्यांनी दोन बदली खेळाडूंना इंग्लंडमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सलामीवीर पृथ्वी शॉ आणि फलंदाज सूर्यकुमार कुमार या मुंबईकर खेळाडूंचा भारतीय चमूत समावेश करण्यात आला आहे.
सुंदरला फिट होण्यासाठी वेळ लागणार
अखिल भारतीय निवड समितीने पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव यांची बदली खेळाडू म्हणून निवड केली आहे, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह म्हणाले. अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे. याच हाताने तो गोलंदाजी करतो. त्याने इंजेक्शन घेतले, पण त्याला पूर्णपणे फिट होण्यासाठी अपेक्षा होती, त्यापेक्षा अधिक कालावधी लागणार आहे. त्यामुळे तो उर्वरित इंग्लंड दौऱ्याला मुकणार आहे, असेही शाह बीसीसीआयने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले.
🚨 NEWS 🚨: Injury & replacement updates – India’s Tour of England, 2021
More Details 👇 #ENGvIND
— BCCI (@BCCI) July 26, 2021
जयंत यादवला संधी नाही
भारतीय संघाने काही दिवसांपूर्वी कौंटी सिलेक्ट इलेव्हन संघाविरुद्ध सराव सामना खेळला. या सामन्यादरम्यान आवेश आणि वॉशिंग्टनच्या बोटाला दुखापत झाली. त्याआधी गिलच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे या तिघांनाही इंग्लंड दौऱ्यातून माघार घेणे भाग पडले आहे. तसेच ऑफस्पिनर जयंत यादवलाही इंग्लंडमध्ये पाठवण्यात येईल अशी चर्चा होती. परंतु, त्याचा भारतीय संघात समावेश झालेला नाही.