स्पर्धांच्या विजेत्यांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह, चषक, पुष्पगुच्छ, रोख बक्षिस किंवा फारफार तर एखादी महागडी वस्तू दिली जाते. मात्र सिंधुदुर्गच्या जानवलीमधील आदर्श नगरमध्ये आयोजित एका क्रीडा स्पर्धेत प्रथम विजेत्याला बक्षीस म्हणून चक्क बकरा, कोंबडा जाहीर करण्यात आला आहे. सध्याच्या घडीला एका बकऱ्याची किंमत ५० हजाराच्या घरात तर गावठी कोंबड्याची किंमत ७०० रुपयाच्या घरात आहे. मात्र असे असतानाही या स्पर्धेत बक्षीस म्हणून जिंवत कोंबडा आणि बकरा जाहीर करण्यात आल्याने ही स्पर्धा सिंधुदुर्गात चर्चेत आहे.
कोरोना संकटामुळे राज्यातील अनेक मैदानी खेळ, स्पर्धा रद्द करण्यात आल्या परंतु आता वर्षभराच्या ब्रेकनंतर पुन्हा अनेक मंडळे, राजकीय कार्यकर्ते, स्पोर्टक्लब विविध स्पर्धांचे आयोजन करत आहेत. यातच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जानवली शिवसेना शाखेच्यावतीने ‘मुख्यमंत्री चषक २०२१’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ५ ते ७ मार्च पासून सुरु झालेली ही स्पर्धा बक्षीसांमुळे सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. कारण या स्पर्धेतील पहिल्या विजेत्या संघाला चक्क चषक किंवा नुसती रोख रक्कम नाही तर जिवंत बकरा, कोंबडी जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये प्रथम येणाऱ्या विजेत्या संघाला ५ हजार ५५५ रुपये रोख आणि एक बकरा, तर द्वितीयसाठी ३ हजार ३३३ रुपये रोख रकमेसह कोंबडा दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर अशी आकर्षक बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. एखाद्या स्पर्धेसाठी अशा प्रकारची बक्षिसे ठेवण्याचा हा प्रकार सध्या गावात चर्चेचा विषय ठरला आहे.
हेही वाचा- RTOच्या ‘या’ १८ सेवा मिळणार आता ऑनलाईन