बंगालने कर्नाटकला १७४ धावांनी पराभूत करत रणजी चषकाच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. रणजीची अंतिम फेरी गाठण्यात बंगालला तब्बल १३ वर्षांनंतर यश आले. उपांत्य फेरीचा सामना जिंकण्यासाठी बंगालने कर्नाटकसमोर ३५२ धावांचे आव्हान ठेवले. मात्र, बंगालच्या मुकेश कुमारच्या ६ बळींच्या जोरावर कर्नाटकचा डाव १७७ धावांतच आटोपला. त्याआधी बंगालने पहिल्या डावात ३१२ धावा केल्या होत्या, ज्याचे उत्तर देताना कर्नाटकचा पहिला डाव १२२ धावांवर संपुष्टात आला होता. दुसऱ्या डावात बंगालच्या संघाने १६१ धावा करत कर्नाटकसमोर ३५२ धावांचे लक्ष्य ठेवले. आपल्या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्नाटकचा संघ १७७ धावांत सर्वबाद झाला. पहिल्या डावात शतक करणारा बंगालचा अनुस्तप मजूमदार सामनावीर ठरला.
That winning feeling! ??
Bengal beat Karnataka by 174 runs to seal a place in the @paytm #RanjiTrophy 2019-20 final. ??
Scorecard ? https://t.co/8vuWwOBGXI#BENvKAR @CabCricket pic.twitter.com/etHvg7IHtn
— BCCI Domestic (@BCCIdomestic) March 3, 2020
कर्नाटकचा सलामीवीर लोकेश राहुलने पहिल्या डावात केवळ २६ धावा केल्या. तर दुसऱ्या डावात ईशान पोरेलने त्याला खातेही उघडण्याची संधी दिली नाही. बंगालकडून पहिल्या डावात अनुस्तपने १४९ धावा केल्या तर, शाहबाज अहमदने २५ आणि आकाश दीपने ४४ धावा करत बंगालच्या विजयासाठी हातभार लावला. कर्नाटकच्या अभिमन्यु मिथुन आणि रोनित मोरे यांनी तीन-तीन बळी घेतले. मुकेश कुमारने दुसऱ्या डावात केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे कर्नाटकचा पूर्ण संघ १७७ धावांत तंबूत परतला. त्यांच्याकडून देवदत्त पडिक्कलने एकाकी झुंज देत ६२ धावा केल्या.