भारतीय क्रिकेटमधील सर्वात मोठी स्थानिक स्पर्धा रणजी करंडकाचा मागील मोसम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला होता. रणजी करंडक न होण्याची ८७ वर्षांतील ही पहिलीच वेळ होती. यंदा मात्र रणजी करंडक आणि विविध वयोगटांतील स्पर्धा घेण्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ठरवले आहे. २०२१-२२ स्थानिक मोसमात तब्बल २१२७ सामने होणार असून रणजी मोसमाला १६ नोव्हेंबरपासून प्रारंभ होईल.
🚨 NEWS 🚨: BCCI announces India’s domestic season for 2021-22
More Details 👇
— BCCI (@BCCI) July 3, 2021
मुश्ताक अली स्पर्धा २० ऑक्टोबरपासून
कोरोनामुळे मागील वर्षी भारतातील स्थानिक क्रिकेट मोसमाचे वेळापत्रक विस्कटले होते. यंदा मात्र संपूर्ण मोसम होणार असून रणजी, सय्यद मुश्ताक अली आणि विजय हजारे या तिन्ही प्रमुख स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धा २० ऑक्टोबरपासून, तर विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धा पुढील वर्षी २३ फेब्रुवारीपासून खेळली जाणार आहे.
रणजी करंडक तीन महिने चालणार
२१ सप्टेंबरपासून सिनियर महिलांच्या एकदिवसीय लीग स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेपासून यंदाच्या स्थानिक मोसमाचा प्रारंभ होईल. त्यानंतर २७ ऑक्टोबरपासून महिलांची चॅलेंजर करंडक स्पर्धा खेळवली जाईल, असे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितले. रणजी करंडक स्पर्धा १६ नोव्हेंबर २०२१ ते १९ फेब्रुवारी २०२२ या तीन महिन्यांच्या कालावधीत पार पडेल. तसेच विजय हजारे स्पर्धेचा अंतिम सामना २६ मार्च २०२२ रोजी खेळला जाईल.