मागील दोन वर्षांमध्ये भारताचा माजी कर्णधार विराट कोहली तणावाखाली असल्याचं दिसत आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात विराट कोहलीने उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली नाहीये. त्यामुळे मानसिक थकवा टाळण्यासाठी विराटनं ब्रेक घ्यावा, अशा प्रकारचं वक्तव्य भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केलं आहे.
गेल्या काही सामन्यांपासून विराट कोहलीचा सूर गवसताना दिसत नाहीये. त्यामुळे विराट कोहलीने दीड-दोन महिने क्रिकेटपासून दूर रहावं. तसेच मानसिक थकवा टाळण्यासाठी विराटनं ब्रेक घ्यावा, असा सल्ला रवी शास्त्री यांनी दिला आहे. एकंदरीत आयपीएलमधील विराटच्या निराशाजनक कामगिरीवर रवी शास्त्रींनी मोठं वक्तव्य केलं आहे.
खेळाडूबद्दल सहानुभूती ठेवायला हवी. प्रत्येकवेळी आग्रह धरून चालत नाही. निर्णय घेताना समजूतदारपणा दाखवावा लागतो. कोहलीची अजून ६ ते ७ वर्ष उरली आहेत. त्यामुळे त्याला अशा तणावाच्या स्थितीत गुरफटलेलं पहाणं कोणालाच आवडणार नाही. तो आणखी खचत जाईल. त्याला या अडचणीचा सामना करावा लागेल पण त्यासाठी त्याला वेळ द्यायला हवा, असं रवी शास्त्री म्हणाले.
विराट कोहलीनं क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटसोबत आरसीबीचं कर्णधारपदही सोडलं. फलंदाजांमध्ये तो उत्तम कामगिरी करेल अशी सर्वांना आशा होती. आयपीएलमध्ये कोहलीने अर्धशतक झळकावलं असून सुद्धा जेवढं पाहिजे तेवढं यश मिळत नसल्याने क्रिकेट प्रेमींमध्ये नाराजी आहे. कोहलीचं करिअर त्याच्या खराब फॉर्ममुळे धोक्यात येणार का? असा प्रश्नही काही दिग्गज उपस्थित करत आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सर्वात मोठा फलंदाज विराट कोहली या हंगामात पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. विराटने या हंगामातील ७ सामन्यात १९.८३ च्या सरासरीने केवळ ४८ धावा केल्या आहेत. विराट कोहलीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १५ कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले होते. नोव्हेंबर २०१९ नंतर विराटला कोणत्याही फॉरमॅटमध्ये शतक झळकावता आलेले नाही. तो सतत फ्लॉप होताना दिसत आहे.
हेही वाचा : Jahangirpuri Violence : द्वेषाचे बुलडोझर बंद करा, राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा