भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना गुरुवारपासून खेळला जाणार आहे. भारतीय संघाने पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर दमदार पुनरागमन केले. भारताने दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत मोठे विजय मिळवत मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. भारताच्या या यशात अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने महत्वाची भूमिका बजावली. या मालिकेत सर्वाधिक विकेट मिळवणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अश्विन अव्वल स्थानावर असून त्याने तीन सामन्यांत २४ विकेट घेतल्या आहेत. तसेच फलंदाज म्हणूनही त्याने दमदार कामगिरी केली असून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने एका शतकाच्या मदतीने १७६ धावा केल्या आहेत. अश्विनने मागील सामन्यात कसोटी क्रिकेटमध्ये ४०० विकेट टप्पा गाठला होता. आता गुरुवारपासून सुरु होणाऱ्या चौथ्या कसोटीत अश्विनला आणखी विक्रम रचण्याची संधी आहे.
-
चौथ्या कसोटीत ६ विकेट घेतल्यास इंग्लंडविरुद्ध भारताकडून सर्वाधिक कसोटी विकेटचा विक्रम अश्विन आपल्या नावे करेल. सध्या हा विक्रम कपिल देव यांच्या नावे असून त्यांनी २७ कसोटीत ८५ विकेट घेतल्या होत्या. अश्विनने इंग्लंडविरुद्ध आतापर्यंत १८ कसोटी सामन्यांत ८० विकेट घेतल्या आहेत.
-
कसोटीच्या पहिल्या डावात १०० विकेट पूर्ण करण्यासाठी अश्विनला आता केवळ एका विकेटची आवश्यकता आहे. अश्विनने कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात आतापर्यंत ९९ विकेट घेतल्या आहेत.
-
वेस्ट इंडिजचा महान वेगवान गोलंदाज कर्टली अँब्रोसला (४०५ कसोटी विकेट) मागे टाकण्यासाठी अश्विनला चौथ्या कसोटीत ५ विकेटची आवश्यकता आहे. आतापर्यंत ७७ कसोटीत अश्विनच्या नावे ४०१ विकेट आहेत.
-
अश्विनने चौथ्या कसोटीच्या एका डावात पाच विकेट घेतल्यास तो ऑस्ट्रेलियाचा महान वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राला मागे टाकेल. मॅकग्राने कसोटीच्या एका डावात ५ विकेट घेण्याची कामगिरी २९ वेळा केली होती. सध्या मॅकग्रा आणि अश्विन यांच्यात बरोबरी आहे.