नवी दिल्लीः रवींद्र जडेजाने डाव्या हाताने श्रीलंकेला चांगलाच धडा शिकवलाय. आधी बॅटने मारा केलाय आणि नंतर कुठलाही चेंडू न सोडता दमदार कामगिरी केलीय. विशेष म्हणजे आता तो गेल्या 60 वर्षांतील पहिला भारतीय क्रिकेटपटू बनलाय, ज्याने श्रीलंकेविरुद्ध उत्तम कामगिरी केलीय. मोहाली कसोटीच्या पहिल्या डावात जडेजाच्या शानदार पराक्रमामुळे श्रीलंकेला फॉलोऑन खेळावा लागला. म्हणजेच भारताची वाटचाल मोठ्या विजयाकडे होताना दिसत आहे. रवींद्र जडेजाचा असा मोठा काय चमत्कार केलाय तोही आता जाणून घेऊयात. रवींद्र जडेजाने मोहाली कसोटीत आपला खेळ दाखवला नसून जादू केलीय. त्याने श्रीलंकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करत मोठी खेळी उभारली. विशेष म्हणजे असे करताना जडेजाने एक विक्रमही केला.
जडेजाने बिशनसिंग बेदीची बरोबरी केली
श्रीलंकेविरुद्धच्या मोहाली कसोटीच्या पहिल्या डावात रवींद्र जडेजाने पहिल्या फलंदाजीत नाबाद 175 धावा केल्या, त्यानंतर चेंडूसह 41 धावांत 5 बळी घेतले. जडेजाचे हे कसोटी क्रिकेटमधील दुसरे शतक ठरले, तर 10व्यांदा चेंडूने 5 बळी घेतले. डावखुऱ्या गोलंदाजाने घरच्या मैदानावर आठव्यांदा 5 विकेट घेण्याची अप्रतिम कामगिरी केली. या प्रकरणात त्याने बिशन सिंग बेदी यांच्या भारतीय विक्रमाची बरोबरी केली.
भारतीय क्रिकेटमध्ये 60 वर्षांनंतर असे घडले
भारतीय क्रिकेटच्या 60 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या खेळाडूने कसोटी क्रिकेटच्या एका डावात 150 पेक्षा जास्त धावा केल्यात आणि 5 किंवा त्याहून अधिक विकेट्स देखील घेतल्यात. अशी कामगिरी करणारा जडेजा तिसरा भारतीय ठरलाय. भारतीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदा विनू मांकडने 1952 मध्ये लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या कसोटीत हा पराक्रम केला होता, त्यानंतर 1962 मध्ये पॉली उमरीगर हा पराक्रमाची पुनरावृत्ती करणारा दुसरा खेळाडू ठरला. आता 60 वर्षांनंतर जडेजा तिसरा खेळाडू म्हणून या यादीत सामील झालाय.
चेंडूने मायदेशातील बिशनसिंग बेदीच्या विक्रमाची बरोबरी करणाऱ्या जडेजाने मोहालीत बॅटने कपिल देवचा विक्रम मोडला. आता तो कसोटीत सातव्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू आहे. कसोटी क्रिकेटमध्ये रवींद्र जडेजाची फलंदाजीमध्ये सरासरी 36.46 आहे. तर गोलंदाजीत त्याची सरासरी 24.50 आहे आणि हे दोन्ही आकडे त्याला महान अष्टपैलू बनवण्यासाठी पुरेसे आहेत.