भारताचा युवा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतने नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत उत्कृष्ट फलंदाजी केली. त्याने सिडनी येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीत ९७ धावांची खेळी केली. मात्र, भारताचा तो सामना जिंकता आला नाही. चौथ्या कसोटीत मात्र त्याने नाबाद ८९ धावांची खेळी करत भारतीय संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. या मॅचविनिंग खेळींमुळे इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत तो भारतीय संघातील स्थान कायम राखण्याची शक्यता आहे. तसेच चेन्नई येथे होणाऱ्या पहिल्या कसोटीत भारतीय संघ रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल यांच्यापैकी दोन अष्टपैलूंसह खेळू शकेल.
ऑस्ट्रेलियातील कामगिरीचा फायदा
पंत आणि वृद्धिमान साहा यांच्यात फलंदाज म्हणून पंत उजवा असला तरी यष्टिरक्षणात तो बऱ्याच चुका करतो. भारतात चेंडू अधिक स्पिन होतो आणि यष्टीरक्षण करणे अवघड होते. त्यामुळे भारतीय संघ मागील काही काळात परदेशातील कसोटी सामन्यांत पंतला, तर भारतातील कसोटी सामन्यांत साहाला संधी देत होता. मात्र, ऑस्ट्रेलियातील दमदार कामगिरीच्या जोरावर आता पंत त्याचे संघातील स्थान कायम राखण्याची शक्यता आहे.
यष्टिरक्षणात सुधारणा होईल
पंत यष्टिरक्षणात चुका करेल यात शंका नाही. मात्र, तो केवळ २३ वर्षांचा आहे. तो जितके जास्त कसोटी सामने खेळेल, तितका त्याला अनुभव मिळेल. या अनुभवांमुळे त्याच्या यष्टिरक्षणातही सुधारणा होईल, असे भारताचे माजी यष्टीरक्षक किरण मोरे यांना वाटते. तसेच पंतला भारतात यष्टिरक्षण करताना खूप मजा येईल असेही ते म्हणाले.
हेही वाचा – इंग्लंडला कमी लेखण्याची चूक करू नका! माजी क्रिकेटपटूची भारताला ताकीद