भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धचा चौथा कसोटी सामना एक डाव आणि २५ धावांनी जिंकत चार सामन्यांची मालिका ३-१ अशी जिंकली. भारताच्या या यशात युवा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतने महत्वाचे योगदान दिले. पंतने चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात ११८ चेंडूत १०१ धावांची खेळी केली. पंत आक्रमक शैलीतील फलंदाजीसाठी ओळखला जातो. परंतु, त्याने अर्धशतक करण्यासाठी ८२ चेंडू घेतले. त्यानंतर मात्र त्याने धावांची गती वाढवत पुढील ५० धावा केवळ ३३ चेंडूतच करत ११५ चेंडूत आपले शतक झळकावले. पंतने इंग्लंडच्या गोलंदाजांवर केलेल्या प्रतिहल्ल्याचे भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी कौतुक केले.
फिटनेस आणि खेळावर खूप मेहनत
पंतवर खूप टीका केली जात होती. परंतु, त्याने मागील तीन-चार महिन्यांत त्याच्या फिटनेस आणि खेळावर खूप मेहनत घेतली असून त्याचे फळ आता त्याला मिळत आहे. त्याचे या कसोटीतील शतक हे भारतीय फलंदाजाने भारतात सहाव्या क्रमांकावर खेळताना प्रतिहल्ला करत केलेले सर्वोत्तम शतक होते. या खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोपे नव्हते. फिरकीपटूंना मदत होती. परंतु, पंतने उत्कृष्ट खेळी केले, असे शास्त्री म्हणाले.
पंत एक मॅचविनर
आम्ही त्याला अधिक शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. त्याने खेळाला अधिक आदर देण्यास सुरुवात असून मागील काही महिन्यांत त्याने वजन कमी केले आणि त्याच्या यष्टिरक्षणावरही काम केले आहे. तो मॅचविनर आहे आणि म्हणूनच आम्ही त्याच्यावर अधिक मेहनत घेण्यासाठी दबाव टाकला, असेही शास्त्री यांनी सांगितले. इंग्लंडविरुद्ध पंतने दमदार कामगिरी करताना चार सामन्यांत २७० धावा केल्या.