भारताचा अनुभवी फलंदाज रोहित शर्माचा क्वारंटाईनचा कालावधी संपला असून बुधवारी तो भारताच्या इतर खेळाडूंना मेलबर्नला जाऊन भेटला. रोहित काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियात दाखल झाला होता. त्यानंतर सिडनीमध्ये दोन आठवडे त्याला क्वारंटाईनमध्ये राहावे लागले होते. आता हा कालावधी पूर्ण झाला असून तो मेलबर्नमध्ये भारताच्या इतर खेळाडूंना जाऊन भेटला. त्याने भारतीय संघ राहत असलेल्या हॉटेलमध्ये प्रवेश केल्याचा व्हिडिओ बीसीसीआयने ट्विटरवर पोस्ट केला.
Look who’s joined the squad in Melbourne 😀
A warm welcome for @ImRo45 as he joins the team 🤗#TeamIndia #AUSvIND pic.twitter.com/uw49uPkDvR
— BCCI (@BCCI) December 30, 2020
‘क्वारंटाईनचा काळ कसा होता मित्रा?’ असे भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्रींनी रोहितला विचारल्याचे या व्हिडिओमध्ये दिसले. भारतीय संघ मेलबर्नमध्ये राहत असलेल्या हॉटेलमध्ये प्रवेश केल्यानंतर रोहित हा चेतेश्वर पुजारा, उमेश यादव, वृद्धिमान साहा, रविंद्र जाडेजा, मोहम्मद सिराज आणि फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांना भेटताना दिसला. भारतीय संघाने नुकतेच मेलबर्न येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला ८ विकेट राखून पराभूत केले होते. या विजयासह भारताने चार सामन्यांच्या या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला ७ जानेवारीपासून सुरुवात होणार असून या सामन्यात रोहित खेळण्याची शक्यता आहे. रोहितच्या समावेशाने भारताचा संघ आता अधिकच मजबूत होईल.