रोहित शर्माने केलेल्या दमदार शतकाच्या जोरावर इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर भारताची ६ बाद ३०० अशी धावसंख्या होती. चेन्नई येथे झालेल्या पहिल्या कसोटीत भारताच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली होती. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी मात्र खासकरून रोहित (१६१) आणि अजिंक्य रहाणे (६७) या मुंबईकर फलंदाजांनी उत्कृष्ट खेळ केला. त्यांच्या शतकी भागीदारीमुळे पहिल्या दिवसअखेर भारताने त्रिशतकी मजल मारली. दिवसअखेर रिषभ पंत (३३) आणि अक्षर पटेल (५) हे फलंदाज खेळपट्टीवर होते. इंग्लंडकडून डावखुरा फिरकीपटू जॅक लिच आणि ऑफस्पिनर मोईन अली यांनी २-२ विकेट घेतल्या.
That’s Stumps on Day 1 of the 2nd @Paytm #INDvENG Test! @ImRo45‘s 161 & @ajinkyarahane88‘s 67 guide #TeamIndia to 300/6. 💪💪@RishabhPant17 & debutant @akshar2026 will resume the play on Day 2.
Scorecard 👉 https://t.co/Hr7Zk2kjNC pic.twitter.com/scONdNQl2W
— BCCI (@BCCI) February 13, 2021
कोहली खातेही न उघडता बाद
या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिल खातेही न उघडता बाद झाला. यानंतर चेतेश्वर पुजारा आणि रोहित यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८५ धावांची भागीदारी रचली. रोहितने आक्रमक शैलीत फलंदाजी करत अवघ्या ४७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. मात्र, जॅक लिचने पुजाराला (२१) आणि मोईन अलीने कोहलीला (०) सलग दोन षटकांत बाद करत भारताला अडचणीत टाकले.
रोहितचे सातवे कसोटी शतक
रोहितने मात्र एका बाजूने अप्रतिम फलंदाजी सुरु ठेवली. त्याला अजिंक्यची उत्तम साथ लाभली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी १६२ धावांची भागीदारी रचली. रोहितने १३० चेंडूत कसोटी कारकिर्दीतील सातवे शतक पूर्ण केले. शतकानंतरही त्याने चांगला खेळ सुरु ठेवला. मात्र, लिचच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात रोहित बाद झाला. तर मोईनने अजिंक्यचा त्रिफळा उडवला. त्यामुळे दिवसअखेर भारताची ६ बाद ३०० अशी धावसंख्या होती.
हेही वाचा : तर कोहलीला भारताचे कर्णधारपद सोडावे लागेल – मॉन्टी पनेसार