टोक्यो ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करणारा भारतीय हॉकी संघाचा ड्रॅग फ्लिकर रूपिंदर पाल सिंहने आंतरराष्ट्रीय पातळीवर हॉकी खेळातून निवृत्ती जाहीर केली आहे. तरूणाईला संधी देण्यसाठी मी निवृत्ती स्विकारत असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. हॉकीमध्ये सर्वोत्तम ड्रॅग फ्लिकर्स म्हणून रूपिंदरची ओळख होती. आतापर्यंत २२३ सामन्यांमध्ये रूपिंदरने भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे.
Hi everyone, wanted to share an important announcement with you all. pic.twitter.com/CwLFQ0ZVvj
— Rupinder Pal Singh (@rupinderbob3) September 30, 2021
भारताच्या टोक्यो ऑलिम्पिक ब्रॉंझ मेडल विजयी सामन्यामध्ये रूपिंदरने महत्वाची भूमिका पार पाडली आहे. या सामन्यात त्याने चार गोल केले होते. त्यात एका पेनल्टी स्ट्रोकचाही समावेश आहे. सध्याचा रूपिंदरचा फॉर्म आणि फिटनेस पाहता आणखी काही वर्षे हॉकी नक्कीच खेळता आली असती असा विश्वास चाहत्यांनी व्यक्त केला आहे. रूपींदर हा बॉब या टोपण नावानेही प्रसिद्ध आहे. रूपिंदरने अचानकपणे घेतलेल्या निर्णयामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
गेल्या दोन महिन्यांमध्ये मी माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम अशा प्रकारचा हॉकीचा खेळ खेळलो आहे. टोक्यो ऑलिम्पिकच्या स्टेडिअममध्ये माझ्या संघातील सहकाऱ्यांसोबत पोडियमवर उभे राहणे हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम अनुभव होता. तो क्षण आयुष्यभर लक्षात राहण्यासारखा आहे, असेही रूपींदरने केलेल्या ट्विटमध्ये नमुद करण्यात आले आहे.
मला विश्वास आहे की नवोदित आणि हुशार खेळाडूंना प्रवेशासाठी वाट मोकळी करून देणे गरजेचे आहे. भारताचे प्रतिनिधीत्व करताना गेल्या १३ वर्षात हॉकी खेळाचा मी जो आनंद घेतला, तो आनंद नव्या पिढीलाही मिळणे गरजेचे आहे, असेही रूपींदरने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
पंजाबच्या फरीदाकोट येथून रूपींदरच्या प्रवासाला सुरूवात झाली. टोक्यो ऑलिम्पिकची स्पर्धा ही त्याच्या आयुष्यातील कमबॅक करण्यासाठीची तसेच अतिशय आव्हानाची अशी स्पर्ध होती. रूपिंदरने आंतरराष्ट्रीय डेब्युट हा मे २०१० मध्ये केला होता. इपोहच्या सुल्तान अझलान शाह कपमध्ये त्याने भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. भारतीय हॉकी संघाच्या बॅकलाईनमध्ये वी आर रघुनाथसोबत ड्रॅग फ्लिक कॉम्बिनेशन म्हणून रूपींदरने संघात आपली जागा पक्की केली.
रूपिंदरला उपकर्णधार पदाची जबाबदारी २०१४ मध्ये विश्व चषकाच्या दरम्यान मिळाली. कॉमनवेल्थ गेम्समध्ये सिल्वर मेडल जिंकण्याचाही मान मिळाला होता. रूपिंदरला आशियाई स्पर्धेत दोनवेळा पदक मिळाले. त्यामध्ये २०१४ चा इंचोऑन स्पर्धेत सुवर्ण तर जकार्ताच्या २०१८ च्या स्पर्धेत ब्रॉंझ मेडल मिळाले होते. दुखापतीमुळे २०१७ सालचा काळ हा सर्वात कठीण काळ असल्याचे त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे.